केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण पडताळणी मोहीम.
अभिप्राय नोंदणी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे आवाहन.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : स्वच्छ भारत मिशन ग्रा.टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ ही पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत पडताळणी उपक्रमांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात निर्माण झालेल्या सुविधांचा वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेला परिसर स्वच्छता शिवाय प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन बदललेल्या मानसिकतेची माहिती घेण्यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ साठी सर्व ग्रामपंचायतींनी योग्य नियोजन करावे. या सर्वेक्षणात लोकांचा सहभाग वाढवून, जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
सन २०१८ पासून केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण ही ग्रामपंचायतींची पडताळणी मोहीम सुरु केली आहे. या सर्वेक्षणातून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच राज्य यामध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण करणे. स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रा. अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर बांधण्यात आलेल्या स्वच्छता सुविधांचा शाश्वत वापर करणे हा प्रमुख उद्देश आहे.
राज्यातील ग्रामीण भागात अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (Academy Of Management Studies) या केंद्र पुरस्कृत त्रयस्थ यंत्रणेकडून गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नमुना निवड पध्दतीने गावांची निवड करुन, ॲपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये कुटुंबस्तर आणि गावातील सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्लास्टिक संकलन केंद्र (PMU), गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन या प्रकल्पांची पाहणी केली जाणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ गुणांकन पध्दत ( एकूण १००० गुण )- ऑनलाईन प्रणाली वरील प्रगती २४० गुण, गावातील प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षण ५४० गुण, जिल्हा व तालुका स्तरावरील प्रकल्प थेट निरीक्षणासाठी १२० गुण, ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी १०० गुण असे एकूण १००० गुणांच्या आधारे ग्रामपंचायत, जिल्हा, राज्य यांचे मुल्यांकन होणार आहे. केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रणालीवरील उपलब्ध माहितीचे यामध्ये जिल्हानिहाय मूल्यांकन करण्यात येणार आहे. नमुना पध्दतीने निवडलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणाद्वारे मोबाईल ॲपवर माहिती भरली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कुटुंबांना भेटी देणे, गावातील सार्वजनिक ठिकाणांना भेटी देणे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत या संस्थात्मक ठिकाणी भेटी देणे, सार्वजनिक शौचालय पाहणी, स्वच्छता संदेश यांची पाहणी, तसेच गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनांची माहिती घेवून फोटो जिओ टॅग केले जाणार आहेत.
गावांमध्ये कुटुंबांच्या भेटीवेळी घरातील स्वच्छतेच्या सुविधांची स्थिती वैयक्तिक शौचालयाचा वापर, हात धुण्याच्या सवयी तसेच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण व त्याकरिता असलेली सुविधा शिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे केलेले काम इत्यादीबाबत माहिती घेतली जाणार आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर उभारण्यात आलेले गोबरधन प्रकल्प, प्लास्टिक संकलन केंद्र (PMU), मैला गाळ, व्यवस्थापन केंद्र यांची पाहणी होणार आहे. तसेच नागरिकांचा अभिप्राय मोबाईल ॲपच्या माध्यमातून व प्रत्यक्ष गावातील भेटी वेळी अशा दोन टप्प्यात घेतला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली. तर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी लोकसहभाग व श्रमदानातून स्वच्छतेच्या सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करत परिसराची स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी करावी, स्वच्छता सर्वेक्षण २०२५ मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
जिल्हावासियांनी गुगल पे स्टोअर वरुन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ (SSG http://localhost/news/public/uploads/2025) हे ॲप डाऊनलोड करुन सिंधुदुर्ग जिल्हा निवड करुन अभिप्राय द्यावा. आपल्या अभिप्रायामुळे जिल्ह्याला गुणांकन मिळणार आहे. तरी जिल्ह्याला स्वच्छता क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्याकरीता जिल्हावासियांनी अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)