कोहलीच्या जीवाला धोका ; चार आयसीस संशयितांना शस्त्रांसह अटक..!
ब्यूरो न्यूज | अहमदाबाद : सोमवारी रात्री गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने अहमदाबादच्या विमानतळावरून आयसीस च्या चार संशयीत दहशतवाद्यांना अटक केल्याचे समजत आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सराव सत्र देखील रद्द केले. तसेच बुधवारी बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघात होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली.
गुजरात पोलीस अधिकाऱ्यांनी कल्पना दिली की बंगळुरूने त्यांचे सराव सत्र रद्द करण्यामागे आणि दोन्ही संघांची पत्रकार परिषद रद्द करण्यामागे प्राथमिक कारण विराट कोहलीच्या जीवाला धोका, हे आहे. अहमदाबाद विमानतळावरून अटक केलेल्या संशयितांकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्याकडे संशयीत व्हिडिओ आणि मेसेज सापडले आहेत. याबाबतची माहिती राजस्थान आणि बंगळुरू संघाला देण्यात आली होती, ज्यावर राजस्थानने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण बंगळुरूने सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवले की ते सराव करणार नाहीत.
पोलीस अधिकारी विजय सिंह ज्वाला यांनी सांगितले की ‘अहमदाबादला आल्यानंतर विराट कोहलीला चार जणांच्या अटकेबद्दल कळवले आहे. तो देशासाठी मौल्यवान आहे आणि त्याची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे.’
याशिवाय अशीही माहिती मिळत आहे की बंगळुरू संघाच्या हॉटेल बाहेरील सुरक्षा अत्यंत कडक केली आहे. त्याचबरोबर बंगळुरू संघासाठी वेगळा प्रवेश मार्गही तयार करण्यात आला असून तिथून इतर कोणालाही प्रवेश नाकारण्यात आला आहे.
पत्रकारांनाही प्रवेश देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघानेही मैदानात येताना ग्रीन कॉरिडोरचा वापर केला होता. त्याचबरोबर राजस्थानने कडक सुरक्षा व्यवस्थेत सराव केला.
दरम्यान, राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना आज बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता चालू होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)