अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्यासमोर जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी वाचला समस्यांचा पाढा.
जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या आवाहनाला वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने महावितरणच्या कारभाराला कंटाळलेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहक, व्यापारी, सरपंच संघटनेला आपल्या समस्या महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्यासमोर मांडण्यासाठी कुडाळ येथे बैठकीस येण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील वीज ग्राहक, व्यापारी आणि सरपंच संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वीज ग्राहक कुडाळ येथे दाखल झाल्याने अधीक्षक अभियंता कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील प्रशिक्षण हॉलमध्ये बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हाभरातून आलेल्या अनेक वीज ग्राहकांनी तालुकावार आपापल्या समस्या अधीक्षक अभियंता यांच्या समोर मांडून तात्काळ लेखी उत्तर देण्याची मागणी केली. जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा रोष पाहता महावितरणचे अधिकारी निरुत्तर झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, ह्युमन राईट्स कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सुनील भोगटे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, सचिव जयराम वायंगणकर, कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ तथा दादा कुलकर्णी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, कुडाळ गोविंद सावंत, माजी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग महावितरणला रत्नागिरी येथील मुख्य कार्यालयातून पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्यत्वे करावयाची ३३ कामे प्राधान्याने करून घेण्याचे सूचित केले होते. यामध्ये लाईनला लागणारी झाडे छाटणी, गंजलेले वीज खांब, वाहिन्या बदलणे, रोहित्रांमधील ऑइल लेव्हल तपासणे अशा कामांची यादी दिली गेली होती. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणने प्रत्यक्षात कामे न करता केवळ कागदावरच कामे केल्याचे दाखवून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना खंडित विजेच्या समस्येला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आज याच मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली असता यावेळी पावसाळा लवकर सुरू झाल्याने महावितरण कामे करून घेण्यात कमी पडल्याची कबुली देत, उघडीप मिळताच झाडांची छाटणी करून घेतली जाईल अशी ग्वाही देऊन नूतन अधीक्षक अभियंता राख यांनी पुढच्यावेळी अशाप्रकारची दिरंगाई होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वीज ग्राहक संघटना व महावितरणचे अधिकारी यांच्यातील चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आपापल्या समस्या वीज ग्राहकांनी मांडल्या.
जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी नूतन अधीक्षक अभियंता यांच्याकडून जिल्ह्यातील वीज समस्या लवकरात लवकर सोडवून वीज ग्राहकांना अपेक्षित असे काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्र.जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी जिल्ह्यातील मुख्य वीज समस्या का निर्माण होतात याचा अधिकाऱ्यांनी सारासार विचार करून जिल्ह्यात अखंडित वीज पुरवठा व्हावा अशी मागणी करून बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल वीज ग्राहक, सरपंच संघटनेचे सरपंच, पदाधिकारी, व्यापारी महासंघ पदाधिकारी आणि महा अधिकाऱ्यांचे आभार मानले.
या बैठकीसाठी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता कुडाळ वनमोरे, कणकवलीचे कार्य.अभियंता माळी यांच्यासह वीज ग्राहक संघटनेचे शिवराम आरोलकर, गोविंद कुडाळकर, शेखर गावडे, नारायण गोसावी, नेरूळ सरपंच भक्ती घाडीगावकर, किरण खानोलकर वाल्मिकी कुबल, उद्योजक संजय तांडेल, अजय नाईक, बाव सरपंच अनंत आसोलकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, झोळंबे उपसरपंच विनायक गाडगीळ, मायकल लोबो, दोडामार्ग सरपंच सेवा संघाचे अनिल शेटकर, गोपाळ गवस आदी वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुडाळ पीएसआय भांड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)