नागेश मोरये यांचे सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच…!
कणकवली I प्रतिनिधी : महामार्ग चौपदरीकरणांतर्गत विशेषतः नांदगांव परिसरात कित्येक समस्या निर्माण झाल्या आहेत. वारंवार लक्ष वेधूनही महामार्ग प्राधिकरण या समस्या सोडविण्याबाबत दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी सभापती नागेश मोरये यांनी १५ ऑगस्ट पासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. श्री.मोरये यांनी यापूर्वी २५ जुलै रोजी याच मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी आठ दिवसांत प्रश्न सोडविण्याची ग्वाही महामार्ग प्राधिकरणाने दिली होती. प्रत्यक्षात काहीही कार्यवाही न झाल्याने श्री.मोरये यांनी १५ ऑगस्ट पासून पुन्हा उपोषणाला प्रारंभ केला आहे. मोरये म्हणाले, महामार्गाचे चौपदरीकरण गरजेचेच होते. मात्र, चौपदरीकरणांतर्गत नांदगाव परिसरातील अनेक कामे अपूर्ण ठेवलेली आहेत. त्यामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे. चौपदरीकरणात तांत्रिक बाबी विचारात घेतलेल्या नाहीत, याचा मोठा फटका आम्हा ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. काहीजण तर हायवेमध्ये गेलेल्या जमिनींच्या मोबदल्यापासूनही वंचित आहेत. अशा कित्येक मुद्द्यांबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. तरीही संबंधित विभागांकडून कार्यवाही सोडाच, समाधानकारक उत्तरेही मिळत नाहीत. म्हणूनच मी आमरण उपोषणास बसलो आहे. या उपोषणाला नांदगाव उपसरपंच नीरज मोरये, भाई मोरजकर, पत्रकार भगवान लोके, सुभाष बिडये, मारुती मोरये, संतोष बिडये, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, विजय म्हाडेश्वर आदींसह ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)