ज्योती व सावित्री या निव्वळ व्यक्ती नसून जागतिक पातळीवरील दोन मोठ्या संस्था : साहित्यीक सरिता पवार
विशेष वृत्त
कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरो चीफ) :अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हीन-दीन समाजाला आणि स्त्रियांना स्वत्वाचे भान देणाऱ्या जोती-सावित्री या केवळ दोन व्यक्ती नसून भारतीय पटलावरच्याच नव्हे तर जागतिक पातळीवरील दोन मोठ्या संस्था आहेत असे विवेचन मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई आणि मूलखी शाखा आयोजित वर्षावास कार्यक्रमाअंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती सप्ताहा निमित्त ऑनलाइन वेबिनार मध्ये ” आम्ही सावित्रीच्या लेकी “या विषयावर बोलताना प्रमुख वक्त्या कवयित्री व साहित्यिक सरिता पवार यांनी केले. प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना कवयित्री सरिता पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. यावेळी पुढे बोलताना सरिता पवार म्हणाल्या की , सावित्री बाई या सदासर्वदा पतिअनुगामी होत्या असे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. ज्योतिबांना साथ देताना त्या काही काही प्रसंगात तर ज्योतिबांच्या ही पुढे निघून गेलेल्या दिसतात. अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच कणखर बाण्याच्या सावित्रीबाई खऱ्या अर्थाने भारतातील सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत होत्या.
आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा स्वतःची ओळख निर्माण करायला स्त्रीला धडपड करावी लागते अशा समाजाला सावित्रीबाईंच्या लोकविलक्षण जगण्याची महती आत्मभानाच्या दृष्टिकोनातून समजून घ्यावी लागेल असे पवार म्हणाल्या. यावेळी मालवण तालुका बौद्ध सेवा समिती गाव शाखा अध्यक्ष राजेंद्र कदम, मुंबई शाखा अध्यक्ष अशोक कदम, गौतम जाधव (सचिव ) मुंबई, वैशाली यादव, सुनिल कदम,सुगंध तांबे,सत्यविजय तांबे (बुद्धवंदना), सतिश कदम,सायली कदम, प्रसन्ना कदम,स्नेहल कदम,(दर्पण महिला फ्रंट अध्यक्ष,),बुद्धिवान तांबे, अनिल तांबे, आदि मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद तांबे यांनी केले
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)