शेतीत उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधारावे यात रस आहे : आमदार निलेश राणे.
कुडाळ मालवण विधानसभा आमदार निलेश राणे यांचे कृषी विभाग खरीप हंगाम तालुकास्तरीय नियोजन बैठकीत मार्गदर्शन.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ येथे आयोजित केलेल्या कृषी विभागाच्या खरीप हंगाम तालुकास्तरीय पूर्वतयारी नियोजन बैठकीत, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून अधिकारी व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले. यावेळी आ. निलेश राणे म्हणाले की, मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय पाहिजे ते विचारलं पाहिजे शेतकरी तुमच्याजवळ येणार नाही पण तुम्ही त्याच्याजवळ जाऊ शकता आणि त्याचे अर्थकारण बदलू शकता.
यावेळी दोन्ही तालुक्यातील शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सत्कार आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार विरसिंग वसावे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सावंतवाडी उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम, कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटिल, कुडाळ तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले, मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, तालुका प्रमुख अरविंद करलकर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये दोन्ही तालुक्यांच्या कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्याचा आढावा दिला त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, शेतकरी मागणारा नाही मंत्रालयात जाऊन कृषिमंत्री अर्थमंत्री यांच्या दालनासमोर उभा राहणार नाही पण आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर त्यांच्या घरी जाऊन माहिती देऊन त्यांचे अर्थकारण बदलण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे फक्त प्रशिक्षणे देऊन चालणार नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन योजनांचा लाभ दिला पाहिजे असे सांगून सध्या कृषी विभागासाठी तरतूद नाही सिंधू रत्न योजनेतून ज्या काही योजना सुरू आहेत त्या शेतकऱ्यांना मिळत आहेत पण पर्यायी निधीची व्यवस्था आपण केली पाहिजे त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन या ठिकाणचा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे त्याचे अर्थकारण बदलले पाहिजे याची जबाबदारी माझ्यासह तुम्हा अधिकारी कर्मचाऱ्यांची आहे. फक्त कागदावरचे आकडे महत्त्वाचे नाही तर प्रत्यक्षात काय काम होतं ते जमिनीवर जाऊन काम केले पाहिजे तरच शेतकऱ्यांची आर्थिक घडी आपण सुधारू शकतो त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या दृष्टीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)