हार्दिक पांड्याची मुंबई इंडिअन्स संघाच्या कर्णधारपदी निवड ; रोहित शर्माचे चाहते नाराज..!
रोहित शर्माला दीर्घकाळ आय पि एल खेळायची इच्छा नसल्याने हा निर्णय झाला असल्याची सूत्रांची माहिती.
मुंबई | क्रीडा वृत्त : आय पि एल मधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडिअन्स संघात हार्दिक पांड्याची काही दिवसांपूर्वी घरवापसी झाली आणि आता त्याच्याकडे मुंबई इंडिअन्स संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदाची सुद्धा जबाबदारी सोपवली आहे.
हार्दिक पांड्याला १५ कोटी रुपयांमध्ये मुंबईने गुजरात संघाकडून ट्रेड केले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या कर्णधार होणार अशी चर्चा होती. पण आता मुंबईने यावर अधिकृत माहिती दिली आहे. २०१३ पासून रोहित शर्माने मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा संभाळली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावले होते.
मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबईने दिलेल्या संधीचे हार्दिक पांड्याने सोने केले होते. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याने शानदार कामगिरी केली. आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याला टीम इंडियातही संधी मिळाली. त्याने ही संधी दोन्ही हातानी घेतली. मागील काही महिन्यापासून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे भारतीय टी २० संघाची धुराही दिली जातेय.
रोहित शर्मा मागील आयपीएलपासून एकही टी २० सामना खेळला नाही. गतवर्षी रोहित शर्माच्या नेतृ्त्वात मुंबईला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच मुंबईने भविष्याचा विचार करत हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिल्याचे बोलले जाते. मुंबईच्या या निर्णायावर रोहित शर्माच्या अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काही जणांनी कौतुक केलेय. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये दीर्घकाळ न खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे मुंबईने हा निर्णय घेतलाय असे सूत्रांकडून समजते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)