मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत सरपंच व ग्रा. पं. सदस्य यांचा सत्कार.
आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार ; अनेक उच्चस्तरीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या’ नवनिर्वाचित सरपंच, ग्रा. पं. सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वायरी येथील आर जी चव्हाण सभागृहात करण्यात आला.
यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, यतीन खोत, मंदार ओरसकर, भाई कासवकर, बाळ महाभोज, शिल्पा खोत, दिपा शिंदे, बाबा सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, अरुण लाड, कमलाकर गावडे, बंडू चव्हाण, पिंट्या गावकर, विजय नेमळेकर, अमित भोगले, तपस्वी मयेकर, नरेश हुले, गणेश तोंडवळकर, समीर लब्दे, चंद्रकांत गोलतकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी आ. नाईक म्हणाले, लोकप्रतिनिधी झाल्यास अनेक ऑफर येत असतात. मात्र ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे, त्याचा कधीच विश्वासघात करायचा नसतो. मलापण आमदार असल्यामुळे ५० कोटींची आणि मंत्रीपदाची ऑफर आली होती. ठाकरे कुटुंबिय आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना त्रास देण्याचे षडयंत्र सध्या राज्यात सुरू आहे. कितीही दबाव आला तरी आपण उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे राहणार आहोत. मी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असून त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या शक्तीवर आज आमदार बनलेलो आहे, असे सांगून निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे काय यासाठी भाई गोवेकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.
ग्रा. पं. निवडणुकीत भाजपाकडून शिवसेनेच्या उमेदवारांना फोडण्यासाठी थेट वैयक्तीक पातळीवर त्रास दिला गेल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. सरपंच पदाच्या उमेदवारांनी आणि सदस्यांनी दबावाला बळी न पडता त्यांच्या पाठिशी स्थानिक शिवसैनिक राहिल्याने त्यांनी विरोधकांना जागा दाखवून दिली. रेवंडी, तोंडवळी याठिकाणी काही वाळू व्यावसायिकांना धमकी देण्यात आली. कोळंब सरपंच यांना तर थेट ब्युटीपार्लर घालून देण्याचीही ऑफर देण्यात आली यातून भाजपला सत्तेची मस्ती आल्याचे दिसून येत आहे. सर्व निवडणूका पैशांच्या जोरावर जिंकू ही त्यांची मानसिकता आता मतदारांनी मोडून काढली आहे, असे ते म्हणाले.
यावेळी कांदळगाव, कोळंब, रेवंडी, असरोंडी, राठिवडे, रामगड, श्रावण, बुधवळे कुडोपी, ओवळीये, वायंगणी, बांदिवडे, तोंडवळी, तळगाव, साळेल, वायरी भूतनाथ या १५ गावच्या सरपंच, सदस्य आणि गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्य गावातील शिवसेनेच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेने सोबत २१ सरपंच असून गाव पॅनल मधील आणखी काही सरपंच सोबत येतील असा दावा आमदार वैभव नाईक यांनी या कार्यक्रमात केला. तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत १०० टक्के यश मिळवण्याचा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)