माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची मुख्याधिकार्यांवर सडकून टीका..!
मुख्याधिकारी व प्रशासक एकच व्यक्ती असल्याने सुव्यवस्थेचा बोज़वारा उडत असल्याची व्यक्त केली खंत.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.संतोष जिर्गे यांनी प्रशासकाच्या भूमिकेतून बाहेर पडून मुख्याधिकारी पदाचे काम करणे आवश्यक आहे तसेच केबिन सोडून प्रत्यक्ष फिल्ड वर जाणे अपेक्षित आहे असे सांगत मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांच्यावर प्रसिद्धीपत्राद्वारे चौफेर टीका केली आहे.
एकाच व्यक्तीकडे प्रशासक मुख्याधिकारी ही दोन्ही पद असल्याने ही परिस्तिथी अशी आहे शहराच्या संपूर्ण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचीही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी खंत व्यक्त केली आहे.
मागील कित्येक वर्षे आडारी डम्पिंग ग्राउंड येथील कचरा उचलून डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करण्यात आले होते तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी भेट देऊन या स्वच्छतेचं कौतुक केले होते परंतु त्याच डम्पिंग ग्राउंड ची आजची परिस्तिथी मुख्य अधिकारी यांनी जाऊन पाहणी करावी असा सल्ला महेश कांदळगांवकर यांनी दिला आहे. याच ठिकाणी सध्या ७० लाख रुपयांचे कचरा विलगिकरणाचे काम सुरू असताना ही परिस्थिती का उद्भवली व टेंडर प्रमाणे काम होत की नाही हे पाहण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का असे सवालही त्यांनी उचलले आहेत.
यापूर्वी कचरा टेंडर वर्षाला सुमारे ४० लाख रुपये होते ते आता ७२ लाख एवढे वाढवूनही कचरा संकलनात अजूनही सातत्य येत नसेल तर पैश्याचा अपव्यय होत आहे असे वक्तव्य महेश कांदळगावकर यांनी केले आहे. भरमसाठ कर्मचारी वाढवण्यात आले पण त्यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्याचं निदर्शनास येतंय. सध्याचा कचरा ठेकेदार हा गटार खोदाई चा ठेकेदार होता. त्याच गटार खोदाई काम व्यवस्थीत नसल्याने त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यास सांगितले होते असे असताना कारवाई न करता त्यालाच कचऱ्याचे टेंडर मंजूर करण्यात आले व या ठेकेदार कडून अजूनही कर्मचारी यांना पगार , प्रॉव्हिडंट फंड, इतर सुविधा पुरवत नसल्याने संप करण्याची पाळी का येत आहे हे पाहण्याची जबाबदारी कोणाची हा पण प्रश्न आहे असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सांगितले आहे.
स्वच्छता पुरस्कार मिळणे हे अभिनंदनास्पद व आनंचेच आहे पण फक्त पुरस्कार मिळण्यासाठी कागदोपत्री सादरीकरण करून एक दिवसाचे स्वच्छतेचे इव्हेंट करून चालणार नाही तर दर दिवशी कचरा व्यवस्थापन परिस्थिती काय आहे हे पाहणे त्यापेक्षा महत्वाचे आहे व फक्त स्वच्छतेचे संदेश भिंतीवर रंगवून हे होणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
जर वेंगुर्ल्याचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे हे स्वच्छतेचे काम करून त्या बाबत पुरस्कार मिळवून देतात याची शासन दरबारी दखल घेऊन वेंगुर्ल्याच्या स्वच्छतेबाबतचा धडा शैक्षणिक पुस्तकात येऊ शकतो तर त्याच वर्गवारीत काम करणारे अन्य मुख्य अधिकारी हे का करू शकत नाहीत हे पण विचार करायला लावणार आहे अशी तुलनात्मक वैचारीक कसोटीही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मांडली आहे.
पर्यटकांच्या सोयींच्या दृष्टीने किनाऱ्यावर बायो टॉयलेट च्या पाच गाड्या घेऊन सुमारे दोन वर्षाचा कालावधी झाला आहे. त्याच देखभाल चे टेंडर पूर्वी २ वेळा काढण्यात आल पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे टेंडर होई पर्यंत ऑफिस मार्फत कामगार घेऊन ते चालवाव याबाबत सूचना करूनही अद्याप त्या गाड्या धूळ खात पडल्या आहेत काही वर्षापूर्वी नवीन सक्शन गाडी घेण्यात आली, पण सध्या अयोग्य नियोजना मूळे पावती केलेल्या नागरिकाकडे तीन चार महिने गाडी पाठवली जात नाही ही वस्तुतिथी आहे. लेखी सूचना करूनही गेले वर्षभर डास फवारणी , फॉगिंग करण्याचं काम बंद आहे . त्यामुळे पुन्हा डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी कडे येत आहेत.
मालवण शहरात पर्यटकांचा ओघ बघता भरड या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे ५ कोटी रुपयांचे मल्टी स्टोरेज पार्किंग प्रस्तावित केलं होतं. पण एवढा निधी एका वेळी उपलब्ध होऊ न शकल्याने या ठिकाणी सुमारे २५ लाख रुपये खर्च करून सध्या पार्किंग व्यवस्था करण्यात आली. पण या पार्किंग च उद्घाटन करण्यासाठी व्यापारी वर्गाला निवेदन द्यावं लागलं. सहा महिन्या पूवी पार्किंगचे दर ठरविण्याबाबत पार्किंग चे टेंडर करण्याबाबत लेखी पत्र देवूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. उदघाटन केल्यापासून आजमितीपर्यंत या ठिकाणी पार्किंगचा साधा बोर्ड पण लावला गेला नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे दिवाळी सिझन ला या ठिकाणी फक्त पाच सहा गाड्या पार्किंग करण्यात आल्या या पासून 600/- एवढं उत्पन्न मिळाले हे विचार करण्यासारख आहे.
पर्यटकांना सोईच्या दृष्टीने सुमारे २५ लाख रुपयाचे दिशादर्शक फलक बसवण्यात आलेले होते. पैकी काही दिशादर्शक फलक चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आल्यानं ते बदलून देणे बाबत किंवा त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना करूनही गेले वर्षभर ठेकेदाराकडुन कुठलीही कार्यवाही झाली नाही प्रशासकडूनही ठेकेदारावर नोटीस देण्यापलिकडे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्याचा फटका दिवाळी साठी आलेल्या पर्यटकांना सहन करावा लागला.
मालवण शहरात अन्य ठिकाणी कारंजे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे कळत याबाबत अभिनंदन पण मालवण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फोवकांडा पिंपळ येथील गार्डन सुशोभीत करून त्या ठिकाणी रंगीत कारंजा बसविण्यात आला होता. पण याठिकाणचा कारंजा गेले सहा महिने बंद अवस्थेत आहे, डेकोरेटिव्ही लाईट बंद आहेत .
शहरात २० ते २५ ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आले होते पण आता त्यातील ८०℅ हायमास्टच्या लाईट गेले वर्षभर बंद आहेत. वारंवार सांगूनही ही काम झालेली नाहीत .
चिवला बीच, मालवण जेट्टी येथे बसविण्यात आलेल्या डेकोरेटिव्ही लाईट पैकी बऱ्याचश्या लाईट गेले सहा महिने बंद आहेत त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. शहरातील स्ट्रीट लाईट ची परिस्तिथी याहून भयानक आहे. त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी स्वखर्चातून बऱ्याचश्या लाईट दुरुस्त करून बसवत आहेत.
मालवण शहरात सुमारे १ कोटी ८० लाख रुपये किमतीचे एक सुसज्ज असे भाजी मार्केट चे काम गेले सहा महिने बंद आहे. त्याच प्रमाणे मामा वरेरकर नाट्यगृह येथे सुमारे ७५ लाख रुपये किमतीच्या मल्टीपर्पज एसि हॉल चे काम पण बंद आहे. सुमारे २ कोटी रुपयांची अग्निशमन इमारत, ५० लाख चे नप आवार सुशोभीकरण ही कामे महिनोंमहिने संथ गतीने सुरू आहेत.
शहरासाठी महत्वाच्या सुमारे ४३ कोटी रुपयांची नवीन नळपाणी योजना, रेवतळे येथील प्रस्तावित १५ कोटी रुपयाचे मत्स्यालय, भुयारी गटर योजना बाबत ११ महिन्यात केलेल्या कामाच्या पाठपुराव्याची सद्यस्तिथी ची माहिती जनतेपुढे ठेवणे अपेक्षित आहे.
फक्त नोटिसा, दंड ही प्रशासकीय प्रक्रिया राबवून कामे होणारी नाहीत. त्यामुळे ज्या उद्देशाने आम्ही आमच्या आमदार ,खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करुन देऊनही जर काम होत नसतील तर विकासाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्यासारखं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सगळ्याच विकास कामांना ब्रेक लागला आहे असेच म्हणावे लागेल त्याच प्रशासक या नात्याने चिंतन करण्याची गरज आहे.
त्यामुळे ज्या प्रमाणे दांडी महोत्सव हा इव्हेंट यशस्वी करून लोकांची वाहवा मिळवली, तोच कोट आता वरील विकास काम करण्यासाठी घालणे आवश्यक आहे. निवडणूक झाली नसल्याने अजूनही आमच्या कालावधीतील लोकप्रतिनिधी कडून जनता कामाच्या अपेक्षा ठेऊन आहे, त्यांची काम करणे आमचं कर्तव्य आहे. पण मागचे १० महिने प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनात थेट हस्तक्षेप करण्यात आम्हाला मर्यादा येत आहेत. पण जनतेची कामे होत नसतील तर आंदोलन करण्याची पाळी आमच्यावर येणार नाही याची काळजी मुख्याधिकारी यांनी घ्यावी हे पण नमूद करावेसे वाटते. कामकाजा बाबत सविस्तर निवेदन खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या कडे करणार आहोत व तसेच कामकाजात सुधारणा न झाल्यास प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांच्या कडे दाद मागण्याचा पर्यायही आमच्याकडे खुला आहे. असेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे नमूद केले आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)