कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार जाहीर.
मसुरे | प्रतिनिधी : सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे मराठी साहित्यातील नव्या कवींना प्रेरणा देण्यासाठी कविवर्य नामदेव ढसाळ स्मृतीप्रीत्यर्थ गोलपिठा काव्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार योजनेला महाराष्ट्रातून ८५ कवींनी आपल्या प्रत्येकी पाच कविता पाठविल्या होत्या. यामधून कवयित्री विद्या पाटील यांच्या कवितांची गोलपिठा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या काव्य पुरस्काराचे परीक्षक म्हणून मराठीतील ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन (वसई ) यांनी काम पाहिले. रोख दोन हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे विविध साहित्यिक पुरस्कार आयोजित केले जातात. गोलपिठा पुरस्कार विजेत्या कवयित्री विद्या पाटील या सिंधुदुर्गनगरी येथील आहेत. त्यांनी या काव्य पुरस्कारासाठी पाठविलेल्या एकूण कविता या स्त्री जाणिवेने लिहिल्या गेलेल्या असून स्त्री अस्तित्वाचा शोध घेणे हे त्यांच्या काव्य लेखनाचे मुख्यसूत्र आहे. स्त्रीच्या चांगुलपणाला उजागर करत तिची स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवणे आणि आत्मसन्मानासाठी झगडताना अनिष्ट गोष्टी झिडकारने हा विचार विद्या पाटील यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आढळत असल्याने त्यांच्या कवितांचा गोलपिटा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला, असे परीक्षक कविवर्य सायमन मार्टिन यांनी स्पष्ट केले आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)