आधुनिक युगातील मानवी समस्यांवर श्रीमद्भगवदगीता मंगलमय किमया घडवू शकते ; ह.भ.प.इंगळे महाराजांनी श्री क्षेत्र अक्कलकोट येथी निरुपणात दिला संदेश.
नामचिंतन व नित्य आराधनेचेही महत्व केले विशद.
मसुरे |प्रतिनिधी : सध्याच्या आधुनीक विज्ञान युगात निरस व बेचैन झालेल्या मानवी जीवनामध्ये सुख, समाधान निर्माण करुन मानवाच्या जीवनासोबतच त्याचा मृत्यूही मंगलमय बनविण्याची किमया भागवत ग्रंथामध्ये आहे असे निरुपण सोलापूरचे भागवताचार्य ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. ते श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने ज्योतीबा मंडपात अधिक श्रावणमासा निमित्त १८ जुलै ते २० जुलै अखेर भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेल्या सप्ताहात निरुपण करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या समारोपानंतर वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी ह. भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून सन्मान केला.
निरुपणात नंतर ह.भ.प.इंगळे महाराज यांनी श्रवण भक्तीतून कशी मुक्ती मिळविता येते हे परिक्षित राजाच्या उदाहरणतून दिसुन येते. गीता हे मानवी जीवन कसे जगावे हे शिकविते तर भागवत जगणे संपल्यावर कसे मृत्युशी एकरुप व्हावे हे शिकविते. भागवतामधील प्रत्येक कथा ही मनुष्याला भगवंताच्या प्राप्तीची अतिशय सुलभतेने कशी प्राप्त होते हे दाखवते. भरत राजाच्या कथेतून जन्म मरणाच्या फेरीतून कसे मोक्ष मिळवावे. गजेंद्र कथेतून पशू पक्षांवरही भगवंताची कृपा कशी होते याचेही विश्लेषण त्यांनी भागवत कथेच्या माध्यमातून केले. मनुष्याने संसारात राहुन परमार्थ कसा करावा याचीही शिकवण भागवतातुन भविष्यातही युगानुयुगे मिळत राहील. महापापी असणारा अजामेळ याचा उध्दार नामचिंतनामुळे झाला असल्याने आजच्या कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीचा सर्वश्रेष्ठ आणि सोपा उपाय म्हणजे भगवंताचे नामचिंतन होय. या नामचिंतनासोबत श्रीमद भागवत गीतेची नित्य आराधना केल्यास मनुष्य जन्म सार्थकी होईल, तसेच निरव्यसनी जीवन, आई वडीलांची सेवा, साधुसंत सेवा, देशसेवा, आणि धर्मरक्षण करीत मानवी जीवनाची मुल्यं जपत शेवटी आपला मृत्यु मंगलमय व्हावा यासाठी गीता आणि भागवत या ग्रंथाचे श्रवण नित्य करावे हाच संदेश आम्हाला संतांनी पण दिला असून संतांची ही विचार सारणी आजच्या तरुणांनीही अंगिकारावी असेही निरुपण करून सुधाकर महाराजांनी वटवृक्ष मंदिरातील अधिक पुरुषोत्तम मासातील भागवत कथा सप्ताहाची सांगता केली.
या कार्यक्रमाला मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संतोष पराणे, प्रथमेश इंगळे, स्वामीनाथ लोणारी, अक्षय सरदेशमुख, प्रदिप हिंडोळे, सुरेखा तेली, मोहन जाधव, विठ्ठल जाधव, वैभव जाधव, महादेव तेली, सागर गोंडाळ, गिरीश पवार, प्रसाद सोनार, संजय पवार, संतोष जमगे, सचिन पेठकर, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, दिपक जरीपटके, प्रसाद पाटील, अमर पाटील, आदींसह हजारो भाविकांनी उपस्थित राहुन या कथा श्रवणाचा लाभ घेतला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)