राष्ट्रवादी काॅन्ग्रेसचा भविष्य काळातील 'आश्वासक चेहरा' शरद पवार ; राष्ट्रवादी काॅन्ग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नवीन फळीसाठी पुन्हा कंबर कसणार असल्याचे केले स्पष्ट.
भाजपा मधील ज्येष्ठ, निष्ठावंत तसेच शिंदे गटातील उत्सुक आमदार यांची मात्र आता आपल्याला चिंता वाटते असे केले प्रतिपादन.
पुणे | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर राष्ट्रवादी काॅन्ग्रेसचे शरद पवार यांनी फुटीरता, बंड, पक्ष फुटणे अशी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. राष्ट्रवादी काॅन्ग्रेसमधील जे आता भाजपाला पाठिंबा देत आहेत त्यांना इ डी चौकशीचा ससेमीरा लागू नये अशी अस्वस्थता होती आणि त्याला कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचक वक्तव्ये असल्याचे कारण शरद पवार यांनी व्यक्त केले.
भाजपाने जर राष्ट्रवादी काॅन्ग्रेसच्या आमदारांना सरकारमध्ये सन्मान व मंत्री पदे देत स्विकारले आहे तर त्याचा अर्थ राष्ट्रवादी काॅन्ग्रेस पक्ष संपूर्ण स्वच्छ आहे हे त्यांना व शिंदे गटाला मान्य असल्याचाही राजकीय टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
पुणे येथील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की आव्हाने आले की आपल्याला आणखीन हुरूप मिळतो त्यामुळे पक्षाचा ‘आश्वासक चेहरा’ आपणच आहोत असे मार्मिक भाष्य केले. राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना थेट मंत्री पदे मिळाल्यामुळे आता भाजपा मधील ज्येष्ठ, निष्ठावंत तसेच शिंदे गटातील उत्सुक आमदार यांची मात्र आता आपल्याला चिंता वाटते असे उपहासात्मक प्रतिपादन त्यांनी केले.
उद्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेत पुन्हा आपण नव्याने पक्ष बांधणी करुन व लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी काॅन्ग्रेसची नवीन फळी देशासमोर उभी करणार असल्याचे ते म्हणाले. या दरम्यान आपण जे सोडून गेलेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई वगैरे वेळ घालवणार नसून पक्षांतर्गत शिस्तीला धरुन निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)