राणेंची ॲलर्जी असलेल्यांनाच ते वक्तव्य म्हणजे धमकी वाटली : आ.नितेश राणे.
विधानसभा मतदार संघाचा पालक या नात्याने विकास कामे कशी सुरळीत होतील याबद्दल जनतेला मार्गदर्शन केल्याचे आ.नितेश राणे यांचे सातारा येथे स्पष्टीकरण.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या नांदगांव येथील वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी ते वक्तव्य मतदार संघाचा पालक या नात्याने केल्याचे स्पष्ट केले. काल सातारा येथे प्रसार माध्यमांच्या यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आ.नितेश राणे यांनी त्यांची बाजू मांडली.
गेली काही वर्षे जनता आपल्या कार्यपद्धतीवर संतुष्ट आहे आणि म्हणूनच सलग दोन निवडणुकांमध्ये आपल्याला आमदार म्हणून सेवा बजावता येत आहे असे सांगताना आ.नितेश राणे यांनी आपल्या मतदार संघातील जनतेला योग्य मार्गदर्शन करुन त्यांना विकासकामे सुरळीत होण्यासाठी भाजपा पक्षाला मतदान करायचे आवाहन केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आपल्या बोलण्याची पद्धत आपल्यावर प्रेम करणार्या जनतेला अचूक माहीत आहे आणि त्याबद्दल त्यांची मने दुखावली जात नाहीत तर ‘राणेंची’ किंवा राणेंच्या कार्यपद्धतीची ॲलर्जी असणार्यांनाच आपले वक्तव्य म्हणजे धमकी वाटली आहे असा टोला आ.नितेश राणे यांनी उत्तरादाखल लगावला.
प्रसार माध्यमांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की आता विकासाच्या बाबतीत बारामती वगैरे उदाहरणे देण्या ऐवजी सर्वांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली प्रगती येऊन जरुर पहावी .
आज कणकवली येथील प्रहार भवनात नांदगांव सभेतील एका वक्तव्याबाबत विशेष पत्रकार परिषदेत आ.नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)