सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता महाराष्ट्रातील शिक्षकांना आदर्शवत...!
” भविष्य अपुल्या हाती” ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा गुणवंत शिक्षकांनी ‘गुणवंत विद्यार्थ्यांना कसे घडवले जाते’ यासंदर्भातील प्रमिता तांबे संपादित “आहे भविष्य अपुल्या हाती” हे आत्मकथन लिहून महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रासमोर आदर्श निर्माण केला आहे. सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षणाची ही गुणवत्ता राज्यभरातील शिक्षकांच्या दृष्टीने अनुकरणीय आहे. त्यामुळे ज्या अकरा शिक्षकांनी आपली शैक्षणिक वाटचाल कथन केली आहे, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कारण यामागे त्यांची अपार मेहनत तर आहेच परंतु त्यांची शिक्षणावरील निष्ठाही लक्षात येते; असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी येथे केले.
‘प्रभा प्रकाशन’ प्रकाशित आणि प्रमिता तांबे संपादित ‘आहे भविष्य अपुल्या हाती’ या ग्रंथाचे प्रकाशन कणकवली येथील वसंतराव आचरेकर नाट्यगृहात कवी अजय कांडर यांच्या हस्ते झाले. कवी मधुकर मातोंडकर यांनी उद्घाटन केलेल्या आणि उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्रप्रमुख नारायण देशमुख आदी उपस्थित होते.त्याच बरोबर प्रमिता तांबे यांच्यासह ‘आहे भविष्य अपुल्या हाती’ ग्रंथातील सहभागी शिक्षक श्री.शिवराज सावंत, सावली सुर्वे, राजश्री शेट्ये, अदिती राणे, ऋतिक राऊळ, तेजा ताटे, ज्योती पवार, पुनम खोराटे, अमोल भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी श्री मातोंडकर यांनी ‘वेदाआधी तू होतास’ या बाबुराव बागुल यांच्या कवितेचे वाचन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.यावेळी सहभागी अकरा शिक्षकांचा स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. उपशिक्षणाधिकारी श्री.रामचंद्र आंगणे म्हणाले, मी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते खूप चांगले काम करणारे शिक्षक मागे मागे राहत असतात. अशा शिक्षकांपैकीच हे अकरा शिक्षक आहेत. त्यामुळे सदर ग्रंथ प्रमिता तांबे यांनी संपादित करून या अकरा शिक्षकांच्या कामाला न्याय मिळवून दिला आहे.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल,सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन श्री.शिवराज सावंत व सौ.राजश्री शेटे मँडम यांनी केले.सूत्रसंचलन सौ.अदिती राणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.ऋतिका राऊळ यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)