<em>आजगाव साहित्य कट्ट्याच्या सभेत कथाकथन…..!</em>
विवेक परब/ एडिटोरिअल असिस्टंट :
‘कथा जीवनाला दिशा देणारी हवी, तसेच कथेमधून सकारात्मक विचार दिला गेला पाहिजे’, असे प्रतिपादन सोमा गावडे यानी आपली कथा सांगताना केले. निमित्त होते, आजगावच्या साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या एकविसाव्या सभेचे. आजगाव वाचनालयात झालेल्या या सभेत तीन वक्त्यानी कथाकथन केले.
सुरुवातीला कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी प्रास्ताविक करून वक्त्यांची ओळख करून दिली आणि उपस्थितांचे स्वागत केले.
त्यानंतर कथाकथनाला सुरुवात झाली. प्रथम विनायक उमर्ये यांनी वि.स.खांडेकर लिखित ‘उःशाप’ ही कथा कथन केली. रामायणाची पार्श्वभूमी लाभलेल्या या कथेने रंगत आणली. क्रौंचवध, पारधी आणि कर्तव्यनिष्ठा यावर आधारित ही कथा श्रोत्यांना कोड्यात टाकून गेली. त्यानंतर सौ.देवयानी आजगावकर यांनी स्थानिक लेखक गोविंद पायनाईक लिखित ‘मठी ‘ ही कथा कथन केली. कोकणच्या भावकीची पार्श्वभूमी लाभलेली ही कथा करुणतेकडे झुकणारी होती. यानंतर लेखक पायनाईक यांनी कथालेखनाची प्रक्रिया समजावून सांगितली. शेवटी सोमा गावडे यांनी स्वतः लिहिलेली ‘आपण सारे कल्पवृक्षातळी’ ही सकारात्मक विचार मांडणारी कथा सांगतली. त्यांची कथन शैली सर्वांना आवडली.
कथाकथनानंतर कट्ट्याच्या सदस्यानी चर्चा केली. त्या चर्चेची सुरुवात ईश्वर थडके यांनी केली तर अनिल निखार्गे यांनी मठी कथेच्या अनुरोधाने कोकणाच्या समाजजीवना संबंधी विचार मांडले. मीरा आपटे, डाॅ. मधुकर घारपुरे आणि शंकर प्रभू यांनीही चर्चेत भाग घेतला. विनय सौदागर यांनी आभार मानले.
सभेला अण्णा झाटये, प्रिया आजगावकर, सरोज रेडकर, रश्मी आजगावकर, एकनाथ शेटकर, अंकुश आजगावकर, अनिता सौदागर आणि चंद्रकांत गवंडे आदी साहित्य प्रेमी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)