नट वाचनालयाचा कै.प्र.श्री.नेरुरकर पुरस्कार आशुतोष भांगले यांना प्रदान.
बांदा | राकेश परब : अत्यंत स्पृहणीय अशी १२५ वर्षांची परंपरा असलेल्या बांदा नट वाचनालयातर्फे देण्यात येणारा प्रसिद्ध साहित्यिक गुरुवर्य कै.प्र.श्री.नेरुरकर साहित्यिक पुरस्कार बांदा येथिल लोकप्रिय लेखक व कवी असलेले युवा साहित्यिक आशुतोष भांगले यांना सोमवारी समारंभ पुर्वक प्रदान करण्यात आला आहे. नट वाचनालयातर्फे १४ फेब्रुवारीला आयोजित कै.प्र.श्री.नेरुरकर यांच्या शताब्दी जयंती सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मॉरिशस येथे कै.प्र.श्री.नेरुरकर यांच्यासोबत एकेकाळी कार्य केलेले श्री. दिलिप ठाणेकर हे होते. यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून प्रा.डॉ.एन.डी.कार्वेकर ,जि.प.सदस्या श्वेता कोरगांवकर, नट वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, नेरुरकर सरांचे विद्यार्थी सदानंद महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन तसेच कै.प्र.श्री.नेरुरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. प्रास्ताविकात सुभाष मोर्ये यांनी सांगितले नट वाचनालयातर्फे दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो.नेरुरकर सरांसारखे रत्न लाभणे हे बांद्याचे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. सरांचे विद्यार्थी अन्वर खान , सदानंद महाजन यांनी सरांच्या विविध आठवणी सांगिताना त्यांनी शिस्त ,शिकवण तसेच विद्यार्थ्यांवर असलेली माया यांचे अनुभव सांगितले. सचिव राकेश केसरकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. त्यानंतर ठाणेकर यांच्याहस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आशुतोष भांगले यांना शाल ,श्रीफळ ,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.
मनोगतात आशुतोष भांगले म्हणाले की बांद्याला पिंपळगाव हे नाव देणारे थोर साहित्यिक प्र.श्री.नेरुरकर यांच्या नावे देण्यात येणारा हा पुरस्कार मला प्राप्त झाला हे माझ्यासाठी मोठे भुषण आहे. मला बांद्यातील समृद्ध व संपन्नतेचा अभिमान असून ते सर्व जगापर्यंत पोहोचवीण्यात फार आनंद वाटतो.आज मला पुरस्कार मिळाला याचा आनंद समस्त बांदावासियांना झाल्याचे मला प्रत्यक्ष अनुभवास आले. संत सोहिरोबानाथांसह अनेक संतांनी विवेकाचे महत्व सांगितले आहे. वाचन व लिखाणात विवेक पाहिजे. एक ओवीसुद्धा जीवन बदलू शकते. मला बातमी लिहिण्यास स्व. सरताज नाईक यांनी शिकवले. संपादक राजेंद्र देसाई यांनी माझ्या लेखणीला विश्वासाचे बळ दिले. यावेळी त्यांनी निवडक कविता व चारोऴ्या सादर करुन सर्वांची दाद मिळवीली.
याप्रसंगी प्रा.डॉ.एन.डी कार्वेकर यांनी प्र.श्रीं.च्या साहित्यासा सखोल आढावा घेतला. त्यांच्या समग्र साहित्य संपदेची कार्वेकर यांनी माहीती दिली. अध्यक्षीय भाषणात दिलिप ठाणेकर यांनी प्र.श्री. यांच्या मॉरिशस मधिल आठवणी सांगितल्या.त्यांच्या साहित्याने मराठी भाषेच्या समृद्धीत मोठी भर पडल्याचे त्यांनी सांगितले. नट वाचनालयाच्या उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी वाचनालयास सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राकेश केसरकर यांनी केले. या कार्यक्रमाला जयंत पिंगुळकर, शुभांगी पिंगुळकर,अनिता चाचड, शंकर नार्वेकर, अंकुश माजगांवकर, गुरुनाथ नार्वेकर , प्रकाश विर्नोडकर, बाळू सावंत,गणेश गर्दे ,गीता गर्दे, जे.डी.पाटील,हेमंत मोर्ये ,मीना सावंत ,लक्ष्मी सावंत आदींस ह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)