आपापल्या 'कालिंदीं'साठीच्या प्रदूषणरूपी कालियाच्या पाच फण्यांची ओळख ....!
आपापल्या 'कालिंदीं'साठीच्या प्रदूषणरूपी कालियाच्या पाच फण्यांची ओळख ....!
निरुपणकार प्रणव गोखले यांच्या निरुपणाद्वारे 'कालिंदीं'च्या विशेष जबाबदारीचे प्रबोधन.
विशेष संपादकीय : 'कालिंदी,' म्हणजेच भारताची पवित्र यमुना नदी असून तिला सूर्य देवाची कन्या देखिल मानली जाते. यमुना नदी उत्तर भारतातील एक प्रमुख नदी आहे आणि गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. हिमालयातल्या बंदरपूंछ शिखराच्या पश्चिम उतारावर असलेल्या यमुनोत्री हिमनदीतून अर्थात् उत्तराखंडातनं ही उगम पावते. प्रयागराज इथं ही नदी गंगा आणि गुप्त सरस्वती नदीला मिळते. हिंदू धर्मात कालिंदी (यमुना) अत्यंत पवित्र मानली जाते. मालवणातील श्री देव नारायण मंदिर इथल्या श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याच्या सहाव्या दिवशीच्या निरुपणादरम्यान, निरुपणकार प्रणव गोखले यांनी कथा विवेचनाद्वारे भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या आणि रासलीलेच्या कालिया मर्दन कथेदरम्यान कालिंदीच्या अंतरंगाचं वर्णन केलं. मूळ गडद रंगाच्या कालिंदी नदीत गरुडाच्या भयानं अतिक्रमण केलेला कालिया आणि जल सत्व तत्वांसाठी त्याचं तिथलं अस्तित्व कालिंदीच्या अंतरंगात आश्रयाला असलेल्या सर्वांना आणि तिच्या काठच्या लोकांना किती भीषण होतं याबद्दल निरुपणकार प्रणव गोखले यांनी 'सद्गुरू वाणीने' विवेचन केलं.
यादरम्यान त्यांनी आपल्या जलस्रोतांबद्दल आणि विशेष करून नद्यांबद्दलच्या खबरदारीचा धर्म समजावला.
निरुपणकार प्रणव गोखले यांच्या निरुपणाद्वारे पर्यावरणाचा जागर जाणवला. सद्य काळात सर्वांगीण प्रदूषण हे कालियाचंच रूप...! नदी नाल्यांचे किनारे
मानवी अतिक्रमीत किनारे व तट, औद्योगिकीकरणासाठी व त्या नादात नद्यांचे प्राकृतिक मार्ग मानवी हट्टानं बदलणं, पर्यटन स्थळं किंवा धार्मिक स्थळांवरचा निष्काळजीपणा, अविघटनशील घटकांचा वापर करून त्यांना नदी, नाले व पाण्यात फेकणं आणि पाण्याचा अपव्यय हे सद्य स्थितीत प्रत्येक कालिंदिचे 'कालियाचे पाच फणे' बनून संपूर्ण सृष्टीसाठी अक्षरशः विषाचे फुत्कार सोडत आहेत असा गंभीर आशय निरुपणकार प्रणव गोखले यांच्या निरुपणातून उलगडून गेला.
मालवणात, श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्या अंतर्गत निरुपणकार प्रणव गोखले यांनी जल प्रदूषणकारी कालिया त्याच्या पाच फण्यांसह समजावलाय हेच खरं....! आपापल्या परिनं आपापल्या आसपासच्या 'जलक्षीर तीर्थांना' म्हणजे गोड पाण्याच्या विविध स्रोतांना 'कालियायुक्त कालिंदी' होण्यापासून निक्षून रोखायचं प्रबोधन व आवाहन निरुपणकार प्रणव गोखले यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)