केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट.
रेल्वेमंत्र्यांकडे गणपती स्पेशल गाड्यांची मागणी.
नवी दिल्ली | ब्यूरो न्यूज : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवार, २३ जुलै रोजी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आगामी गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी, तसेच रेल्वे व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता, कोकणवासीयांसाठी विशेष गणपती रेल्वेगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.

यावेळी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि गोवा या ठिकाणांहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या, ऑनलाइन आरक्षण गर्दीमुळे सर्वसामान्यांना तिकीट मिळण्यात होणाऱ्या अडचणी, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला आणि सावंतवाडी परिसरातील गावी जाण्यासाठी थेट विशेष गाड्यांची आवश्यकता हे मुद्दे भेटीदरम्यान मांडण्यात आले.
खासदार राणे यांच्या या बैठकीनंतर रेल्वे मंत्रालय सकारात्मक पाऊल उचलेल, अशी अपेक्षा कोकणवासीय व्यक्त करत आहेत. कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी गणपतीच्या काळात तिकीट मिळवणे हे एक मोठं संकट ठरतं, यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठीही राणे साहेब प्रयत्नशील आहेत. गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी केवळ सण नाही, तर भावनांची पुनर्भेट आहे आणि ती वेळेवर होण्यासाठी रस्ते आणि रेल्वे या दोन्ही माध्यमांची गरज आहे. खासदार नारायण राणे यांचा हा पुढाकार एका लोकप्रतिनिधीने वेळेवर उचललेलं पाऊल महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)