ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सर्वशक्तियुतेऽनन्ते भराडी नमोस्तुते..

सर्वशक्तियुतेऽनन्ते भराडी नमोस्तुते..

प्रकाशन: 22 Feb 2025 10:27 AM
वाचन संख्या 268

आई भराडी.. युगानूयुगे की पिढ्यानपिढ्या.. किती वर्ष ती तिथं आमची वाट पाहतीय.. काळ सरकत गेला पण ती तिथंच आहे आई बनून , शक्तीदात्री बनून , पृथ्वीच्या परिवलनातही सगळ्या लेकरांना पाहत.. चंद्र सूर्य आकाशगंगाच्या प्रकाशाची ओंजळ आपल्या कृपाशीर्वादाने प्रत्येकाला आभाळाच्या मापट्यानं वाटत.. आई भराडी.. शक्ती आणि चैतन्याचे एक नाव आहे आणि अर्थात त्या शक्तीपीठाचे श्री क्षेत्र आंगणेवाडी हेच नाव आहे.

दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा जवळ आली की डोळ्यासमोर स्फटीक प्रकाशांची निळाई असा फेर धरते आणि आईच्या सोहळ्यासाठी शारदेच्या साहित्यकुंभातून शब्दांची ओळमाळ अशी टपटप घरंगळून जाते. आपण फक्त प्राजक्त वेचावा तसा त्या पठारावर धावत सुटावे आणि जमेल ते अक्षर ओवत आईबद्दल लिहावं. त्यातल्या प्रासादिकतेचं, त्यातल्या वृत्तबद्धांचे आपल्याला काहीही देणभार नसतो आपण फक्त त्या गाभाऱ्याला आठवून लिहीत राहायचं.. मंदिराबाहेर बसलेल्या कुणा साधूसारखं एकतारीवर ती कवन उच्चारत जावी..


प्रतिवर्षी आईचा सांगावा आणि लेकरांचा महाऊत्सव फक्त एवढ्या शब्दात आंगणेवाडीची जत्रा नसते.. मनातील मागणे पुरं झालं आणि ते आईने केल हा विश्वास मग प्रत्येक माणसाला पुन्हा भक्तपणाचे दान देते आणि मुठीत माणूसपणाची एक अनाम रुजवात देते. माझ्या देवीनं माझं ऐकलं अशी एक माणसाची रांग असते आणि दुसरी असते देवी माझ्याकडे पाहायला त्या मंदिरात उभी आहे. तिच्या नजरेला मी पडलो पाहिजे.. दरवर्षी लाखो येणाऱ्या माणसांची दरदहा वर्षांनी कोट्यवधी माणसे होतात.. आणि आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर अब्जोवधी माणसांच्या दोन डोळ्यांना ती तशीच दिसलीय , त्यांच्या मनातल्या मागण्यांना तथास्तू म्हणत.. त्या रुपाला उत्सवात मुखवट्याचे तेज येते आणि वर्षभर ते तेज भक्तांच्या पाठीशी रुप बनून पुढे चालायला शिकवते.

तुमची यात्रा मोठी की आमची यात्रा मोठी.. तुमची देवी मोठी की आमची देवी मोठी असे हट्ट मनाशी घट्ट बांधून यावेत आणि एकदा का जत्रेच्या या तिर्थात स्वताला थेंब म्हणून सोडलं की त्या जनसागरातल्या भक्तीच्या तरंगातले तेज आपल्या देहथेंबाला मिळते.. पुढचे कमीत कमी सात आठ तास त्या भक्तीकल्लोळात स्वताला विसरुन जायचे.. दर्शन घ्यायचे आणि मग जड अंतकऱणाने पण तरीही एका असीम परिपुर्तीने गाभाऱ्यातल्या त्या चैतन्याला डोळ्यात साठवत पुन्हा एका वर्षांसाठी डोळ्यात साठवायचं आणि आईला पापण्यांच्या आत देव्हाऱ्यात घेऊन मिरवायचं..

काय वेगळी असते भावना इथल्या भक्तांची.. त्यांना कदाचित शब्दांत मांडता येत नसेल पण देवीतत्व ज्या रुपात ज्याला जसे दिसते तसा त्याच्या आयुष्याचा सोहळा होतो. त्या रुजीव पाषाणात आणि त्याच्यावर कृपाछत्र असणाऱ्या कळसातही असणारा जो दैवी आशीर्वाद आहे ना तो प्रत्येकासाठी आहे. त्याला ना कुठल्या गाऱ्हाण्याची गरज आहे ना नवसाची.. प्रत्येकांने इथ हक्काने यावे आणि मागण्याच्या पल्याड मिळालेल्या दानसमृद्धीची गोष्ट सांगावी एवढी वैभवाची गोष्ट या जत्रेत वेगवेगळ्या कथेतून तुम्हाला भाविक बनवते.

माणूस म्हणून जगण्याला एक श्रद्धा लागते. ती श्रद्धा असली की देहापासून संजीवन श्वासापर्यंत प्रत्येक गोष्टीला एक कृपाभिलाषीपणाची आपोआप झालर मिळते. जत्रा ही हौशा गवशा आणि नवशांची असते असे म्हणतात.. पण मला त्यापल्याड नेहमी वाटते जत्रा फक्त देवाला आलेल्या लेकरांची असते.. काहीची वाट थेट मंदिरात जाते, काहींना ती वाट पुन्हा पुन्हा चालावी लागेत.. तर काहींना त्या वाटेच्या आजुबाजूला असलेल्या वाटांनी मुळ वाटेकडे यायचा दंडक असतो.

आंगणेवाडीच्य मंदिराच्या समोर शेतमळ्याच्या ऐवजी एखादी प्रवाही नदी असती तर तीही वळसे घालून चंद्रभागासारखी गेली असती.. पण समोरच्या त्या शेतमळ्यांतल्या पिकांचे भाग्य मोठे आहे. रुजताना जगताना देवीला पाहायचं आणि रिते झाल्यावर देवीभक्तांच्या मंदिरातून आलेल्या पावलांनी आपला मळा पठार पावन करुन घ्यायचं…

ही जत्रा कोलाहलातील ती अमृतशांतता आहे की जी प्रत्येकाला पुर्णत्वाचे दान देते. माणस आजुबाजूला सरकत राहतात आणि अशावेळी एका चिरंतनपणात देवी त्या जत्रेत तुम्हाला कधीच हरवू देत नाही.. तुमच्या आठवणीने आणलेल्या लान्याला तुम्ही घरी जायच्या आत प्रसाद म्हणून सुखाचे तोरण तुमच्या घरादारावर चढवते.. आणि तुमचं नवसाचं लानं दरवर्षी सोन्याचे बनून कळसावर सोन्याची प्रभा झळकत राहते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स