आगीमुळे कलम बागेचे जळून नुकसान झाल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता....
मालवण | प्रतिनिधी : मोकळया गवत वाढलेल्या माळरानाच्या जमीनीवर आग लावल्याने व सदर आग न विझविल्याने ती वाढत जावून फिर्यादीच्या आंबा काजू कलम बागेचे जळून नुकसान झाल्याच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी देविदास लक्ष्मण खडपे (वय ५०) रा. वायरी-भूतनाथ, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग याची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. स्वरूप नारायण पई यांनी बाजू मांडली.याबाबत आरोपीने गाव मौजे साळकुंभा नांदरूख येथील त्याचे जमिनीची मोजणी असल्याने जमिनीची साफसफाई करीत असताना गवतास आग लावली होती. आरोपीस त्याचे जमिनीच्या शेजारी शंकर सुंदरनाथ किडये यांची आंबा काजू कलम बाग असल्याचे माहित असताना व माळरानावर लावलेली आग विजवणे कठीण असते हे माहित असताना देखील बेफिकीरपणे मोकळया रानावर आग लावली व ती वेळेत न विजविल्याने फिर्यादीच्या बागेत आग पसरत जावून फिर्यादीचे बागेतील कलमे, ठिंबक सिंचनचे पाईप व पत्राचे शेडचे जळुन नुकसान झालेले आहे, अशी फिर्याद मालवण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी मालवण पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी आरोपी विरूध्द तपासकाम करून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते. याकामी सरकार पश्चातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व साक्षीदारांचे जबाबातील विसंगती, तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब, तपासकामातील त्रुटी व आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेवून मालवण येथील मे. प्रथमवर्गन्यायदंडाधिकारी यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)