आंबा व काजू पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात ; आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी केला होता सतत पाठपुरावा.
३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी रु. रक्कम देण्याचे काम सुरु.
शेतकरी वर्गाने मानले आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांचे आभार.
कणकवली | प्रतिनिधी : गेले काही महिने आंबा काजू पिक विमा रक्कम विषयी सतत पाठपुरावा करणारे आमदार वैभव नाईक व जिल्हा बॅन्क माजी अध्यक्ष सतिश सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आंबा व काजू फळ पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेल्या आंदोलनाला व पाठपुराव्याला यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात फळ पीक विम्याची रक्कम जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांचे आभार मानले आहेत. जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी रु रक्कम देण्याचे काम सुरु आहे. पुढील दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना आंबा व काजू पीक विम्याची रक्कम दिली जात नसल्याने आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी १ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांनी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांच्या समवेत बैठक घेऊन नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात संबंधित सर्व पात्र बागायतदारांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाई जमा करण्याची ग्वाही दिली होती तसे लेखी पत्र विजयकुमार राऊत यांनी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)