वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जल, जमीन आणि जंगल आवश्यक आहे ; श्री गजानन शेट्ये.
गोगटे वाळके महाविद्यालय, बांदा व रानजाई निसर्ग मंडळाच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताहा’च्या निमित्ताने कार्यक्रम संपन्न.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालय व रानजाई निसर्ग मंडळाच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताहा’च्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दोडामार्ग येथील पर्यावरण मित्र श्री गजानन शेट्ये उपस्थित होते. “वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जल ,जमीन आणि जंगल यांची आवश्यकता आहे त्यासाठी या तिन्ही गोष्टींचे संवर्धन ही काळाची गरज आहे”, असे उद्गार शेटये यांनी काढले. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जैवविविधतेबाबत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना चित्रफितीमार्फत मार्गदर्शन केले. उत्कृष्ट ‘निसर्ग तज्ञ तथा प्रेमी’ पुरस्कार प्राप्त श्री प्रवीण सातोसकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिला व मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रानजाई निसर्ग मंडळाचे समन्वयक प्रा. शरद शिरोडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना प्रा. डॉ. एस. पी. वेल्हाळ यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे असे म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी काजरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी गार्गी विर्नोडकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)