मी बिया पेरल्या आहेत, मी प्राणवायू जपणार आहे ; छोट्या कबीराचा निसर्ग दोहा. ( विशेष )
मालवण | सुयोग पंडित : आपली चूक नसताना ठामपणे ‘”मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही”, हे टिळकांचे वाक्य जाज्वल्य ताठ कण्याचे एक शिकवण उदाहरण आहे. निसर्गासमोर मात्र सध्या मानवाला हा आविर्भाव ठेवून चालणार नाही इतकी निसर्गाची अपरिमित हानी सध्या होत आहे व झालेली आहे. सावंतवाडी शहरातील शांती निकेतन स्कूलच्या एका दुसरीच्या विद्यार्थ्याला निसर्गासमोर लवचिक होत त्याला व पर्यायाने पर्यावरणाला जपायची इच्छा आहे. कु. कबीर हेरेकर असे त्याचे नांव आहे. त्याचे वय संदेश वगैरे देण्याएवढे मोठे नाही परंतु त्याच्या मनावर ‘पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धन’ हे दोन घटक उत्तमपणे बिंबवले गेले आहेत.
कु. कबीर हेरेकर याने यंदाचा स्वातंत्र्य दिन एका अनोख्या पद्धतीने साजरा केला. स्वतः गोळा केलेल्या आंबा, फणस व जांभूळ बिया त्याने मळगांव व इन्सुली येथील जंगलात जाऊन पेरल्या. यात १०८ आंब्याच्या बाठी, ८७ फणस बिया आणि ६२ जांभूळ बिया अशा एकूण २५७ बियांची त्याने पेरणी केली. निसर्ग व पर्यावरण यांकडे कबीरची ओढ ही प्राणवायू शुद्धीकरण, संधारण व वृक्ष संवर्धन या अत्यावश्यक गोष्टींना थेट हात घालणारी आहे आणि त्यामुळेच या ‘छोट्या कबीराची ही कृती मानवजाती साठी कृतीचा निसर्ग दोहाच आहे….नाही का..!’
छोट्या कबीर हेरेकर हा एरवीही सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांत त्याचे वेगळेपण जपत असतो ज्यात त्याचे पेशाने शिक्षक असणारे वडिल नावेद हेरेकर हे त्याला मार्गदर्शन करतात. मार्गदर्शनना नंतरची समाज व निसर्ग उपयोगी कृती कु. कबीर सातत्याने करत असतो म्हणून त्याची विशेष प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)