मच्छिमारी नौका बुडाली ; एकाने पोहत गाठला किनारा तर इतर दोघांचा शोध सुरु.
ब्युरो न्यूज | मुंबई : काल ५ ऑगस्टला रात्री मासेमारी करण्यासाठी गेलेली एक बोट मुंबईच्या वर्सोवा समुद्रात बुडाली. त्यावेळी त्या बोटीत ३ मच्छिमार बांधव होते. त्यांच्यातल्या एकाने पोहत किनारा गाठला असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. बेपत्ता दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. काल रात्री तिघेजण वर्सोवा समुद्रात बोट घेऊन मासेमारी करण्यासाठी उतरले होते. त्यावेळी साधारण ९:३० च्या दरम्यान बोट अचानक बुडाली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्यावेळी ती बोट बुडाली त्यावेळी त्या बोटीत तिघेजण होते. त्यातील विजय बामनीया ( वय ३५ )या मच्छिमार बांधवाने मोठ्या कष्टाने समुद्र किनारा गाठला असे पोलिसांनी सांगितले आहे. उसळत्या लाटांमध्ये बोट पलटली असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
त्यानंतर पोलिसांनी इतर पथकांच्या मदतीने त्या दोघांचा शोध घ्यायला सुरुवात केली. रात्र असल्यामुळे त्यांना शोधण्यात रेस्क्यू पथकाला अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल अशी बेपत्ता झालेल्या मच्छिमारांची नावे आहेत. लाइफ गार्ड, बीएमसी आणि कोस्ट गार्डचे पथक शोध मोहीम राबवत आहेत. अद्याप दोघांचाहि शोध लागला नसल्याचं पथकांनी सांगितलं आहे. त्यांचा शोध सुरु असल्यामुळे वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापुर्वी सुध्दा याच परिसात अनेक मच्छीमारांचा बोट बुडाल्यामुळे मृत्यू झाला आहे असे स्थानिक मच्छिमार बांधवांनी स्पष्ट केले असल्याचे सूत्रांकडून समजते.
सध्या पावसाळ्यात समुद्राचा अंदाज येत नसल्याने मच्छिमार बांधव व पर्यटकांना मुंबई पोलिस प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
फोटो सौजन्य | मुंबई ब्युरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)