स्वराज्यभूमी कोकण यात्रा सुरु..
ब्युरो न्यूज | मुंबई :
स्वराज्य भूमी कोकण यात्रेचा शुभारंभ समृध्द कोकण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यांच्यामार्फत रायगडचे प्रवेशद्वार असलेल्या व आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण येथून सुरू झाला व त्यानंतर पेण गागोदे येथील आचार्य विनोबा भावे यांच्या पेण येथील जन्मस्थळ येथे भेट देवून पुढे मार्गस्थ झाला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक योगदान कोकणच्या भूमीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज ,धर्मवीर संभाजी महाराज ,सरनोबत प्रतापराव गुजर, सरसेनापती नेताजी पालकर , नरवीर तानाजी मालुसरे ,हिंदवी साम्राज्याचे सूत्रधार पहिले बाजीराव पेशवे, भारतीय आरमाराचे पहिले प्रमुख कान्होजी आंग्रे, 1857 च्या बंडाची सूत्रधार झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक,स्वातंत्र्यवीर सावरकर ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्न महर्षी धोंडो कर्वे,
अशी अनेक राष्ट्रपुरुष कोकणच्या भूमीने देशाला दिले.या देशाच्या राष्ट्र निर्माणमध्ये व स्वातंत्र्याच्या निर्मितीमध्ये कोकणच्या भूमीचे खूप मोठे योगदान आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सर्व राष्ट्रपुरुषांच्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अभिवादन आणि कृतज्ञता अशा स्वरूपाची एक महत्वपूर्ण स्वराज्य भूमी कोकण यात्रा समृद्ध कोकण प्रदेश संघटनेच्या वतीने आणि ग्लोबल कोकणच्या वतीने सुरुवात करण्यात आली.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण गावापासून ही यात्रा सुरू करण्यात आली या यात्रेत सुमारे 200 देश प्रेमी कोकणवासीय नागरिक आणि युवक सहभागी झाले, राज्याचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झाला. मुंबई गोवा महामार्गावर आद्य क्रांतिकारक यांच्या नावांचे कार्याचे प्रबोधन व्हावे व महामार्गाला स्वराज्य भूमी कोकण असे नाव द्यावे अशी प्रमुख मागणी या यात्रेच्या निमित्ताने करण्यात आली. स्वराज्य भूमी कोकण महामार्गावरील सर्व चौक या महामार्गावर अनेक राष्ट्र पुरुषांची गावे आहेत त्यांच्या नावाने हे चौक बनवावेत अशा स्वरूपाची संकल्पना समृद्ध कोकणचे संस्थापक संजय यादवराव यांनी यावेळी मांडली.
या अभियानाला संपूर्ण सहकार्य करण्याचे महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून प्रवीण दरेकर यांनी मान्य केले.
कोकणचा प्रेरणादायी इतिहास आणि स्वातंत्र्याच्या लढाईतील कोकणचा सहभाग जगासमोर यावा याकरिता ही स्वराज्यभूमी कोकण यात्रा आयोजित केली आहे. यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.मंगेश नेने,सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र उपाध्यक्ष समीर म्हात्रे,पेण मूर्तिकार संघटना अध्यक्ष श्रीकांत देवधर,वडखळ माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.निलेश म्हात्रे, पाटील यांनी भारतरत्न विनोबा भावे यांची माहिती यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांना दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)