<em>स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही धनगर समाज मागासलेलाच - प्रवीण काकडे.</em>
दुर्गम भागाचा सर्व्हे करण्याची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची प्रशासनाकडे मागणी..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षाचा कालखंड होत असुन आजही दुर्गम दर्या खोऱ्यातील जंगलातील व भटकंती मेंढपाळ करणारा धनगर समाज असेल किंवा फासेपारधी, कुडबुडेजोशी कातकरी , लोहार ,गोसावी , किंवा वंचित घटकातील समाज बांधव आजही विकासापासून वंचित आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी दरी डोंगरातुन ,जंगलातुन वणवण भटकत करावी लागत असल्याची खंत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी विविध जिल्ह्यांतील अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.
या निवेदनात ते म्हणतात गेली ७५ वर्ष आम्ही राजकीय पक्षांना मतदान करत आहोत परंतु आजही सर्वच राजकीय पक्षांकडून व राजकीय नेतेमंडळींनी धनगर समाजाला किंवा इतर जाती ना अंधारात चाचपडत ठेवण्याचे महापाप राजकीय नेतेमंडळीनी केले आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्याने केंद्र सरकारकडून प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत म्हणून प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा लाऊन अमृतमहोत्सव साजरा करावा असे सांगण्यात आले आहे.या उक्रमास आमचा विरोध मुळीच नाही परंतु, आजही या देशातील व महाराष्ट्रातील गोरगरीब वंचित घटक व भटंकती करणाऱ्या आमच्या धनगर समाजाला राहायला घरच नाही! अशा अवस्थेत असणाऱ्या आमच्या समाज बांधवांनी कुठे झेंडा वंदन करायचं? हा प्रश्न आहे.
किंबहुना महाराष्ट्रातील जे अतिदुर्गम भागातील सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड,या जिल्ह्य़ातील आमचा बांधव अनेक मुलभूत सुविधापासून वंचित आहे.
या जिल्ह्यात रस्ते, आरोग्य, पाणी, शिक्षण या सुविधांपासून वंचित ठेवण्यात आलंय. आजही कित्येक समाज बांधवांचे नावावर घरे आणि जमिनी नाहीत.
वनविभागाचा नाहक त्रास सहन करून आयुष्य जगत आहेत. संघटनेच्या माध्यमातून या सातही जिल्ह्यातील गेली दोन वर्षापासून ११९ धनगर वाड्यावर जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर असे दिसुन आले आहे की, आमचा समाज बाधवांना खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे का? हा प्रश्न चिन्ह आहे. शिक्षणासाठी मैलोनमैल १२ते १४ किलोमीटर अंतर पायपीट करावे लागतात.
एखाद्या वृध्दा अथवा गरोदर स्त्रिला हाॅस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी डोली करून घेऊन जावे लागते हे समाजाचे दुर्दैव म्हणावे लागेल.यात कमी काय म्हणून पायपीट करताना वन्यप्राणीच्या हल्ल्यातही अनेकांजन जखमी झाले आहेत तर काही मृत्युला कवटाळून घ्यावे लागले आहे.जंगल भागात दर्या खोर्यात राहणार्यां आमच्या बांधवांना साधी दवाखान्याची सोय उपलब्ध नाही.
या सातही जिल्ह्यातील धनगर समाज बांधव आजही आदिवासी प्रमाणेच जीवन जगत असून धनगर समाज मेढपाळी, भटकंती करून ऊन,वारा पाऊस याचा सामना करून जीवन जगत आहेत. आजही या लोकांना आंबा, फणस, कंरवद, जांभुळ विकून उदरनिर्वाह करावा लागतो. आमची केंद्र सरकार , महाराष्ट्र सरकार , राजकिय नेते तसेच प्रशासनाला विनंती करत आहोत की, या भागाचा, डोंगर दऱ्याखोऱ्यातील या धनगर जमातीचा,संबंधित जिल्ह्यातील दुर्गम भागाचा प्रशासनाने पाहणी करून केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांना अहवाल सादर करुन या वंचित घटकातील समाज बांधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महासंघ प्रवीण काकडे यांनी विविध जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदना व्दारे केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)