आम्ही गद्दारी केली नाही तर उठाव केला…!
शिंदे सरकार विश्वासदर्शक ठरावात उत्तीर्ण.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील भाषणात मांडलेला राजकीय युक्तिवाद..?
आमदार अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड.
मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच विधानसभेत विचार मांडणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या युवावयातील शिवसेना शाखा प्रमुखपदापासून ते आज राज्याचा मुख्यमंत्री होईपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या शैलीमध्ये कथन केला.
या दरम्यान आमदार अजित पवार व इतरांनी मार्मिक भाषेत केलेल्या टीकेला त्यांनी त्याच मार्मिक भाषेत उत्तर दिले.
माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सरकार बांधणीसाठी खरी ‘कलाकारी’ केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारातला महाराष्ट्र व सरकार स्थापनेसाठी आपल्याला हा उठाव करावा लागल्याचे सांगताना त्यांनी गेली अडिच वर्ष आपण आपली खरी भूमिका मांडू शकत नव्हतं पण आता ‘टाॅलरेट’ म्हणजे सहन होत नव्हतं अशी एक वेगळाच पक्षांतर्गत व म.वि.आ. सरकार काळादरम्यानची त्यांची सल बोलून दाखवली.
अतिशय ओघवत्या शैलीत भाषण करणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात त्यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांचा चौफेर समाचार घेताना विरोधी पक्षातील सर्व सदस्यांना त्यांची नियोजीत कामे रखडली जाणार नाहीत अशी जाहीर ग्वाही दिली.
दरम्यान सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी मिडियाशी सुसंस्कृतपणे संवाद चालू ठेवला होता म्हणून आपण शांत राहू शकल्याचे सांगितले.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांच्या युतीचीच पुनर्बांधणी म्हणजे आपले सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपा नेते अमित शहा , भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या शुभेच्छा व साथ आपल्यासोबत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत त्यांचे जाहीर आभार मानले.
सरतेशेवटी त्यांनी आमदार छगन भुजबळ, आमदार भास्कर जाधव यांना त्यांच्या त्यांच्या शंकांना खास शैलीत उत्तरे दिली.
हे सरकार शिवसेना भाजप युतीचे असून यात सर्वच जण मुख्यमंत्री आहेत व आपल्याला मुख्यमंत्री पदाची लालसा नाही किंवा हवा डोक्यात जाणार नाही असाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्वाळा दिला.
गेले पंधरा दिवस थोडंसं राजकीय तणावाचे असलेले महाराष्ट्र विधानसभेचे वातावरण निदान आजतरी थोडे निवळवायचा प्रयत्न करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर व आजपर्यंतच्या राजकीय व कौटुंबिक जडणघडीचा जीवनपट या भाषणाद्वारे उलगडून दाखवला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)