रत्नागिरी जिल्ह्यातील एकच आमदार शिंदेच्या गटात..!
आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबतच..
वैभववाडी | प्रतिनिधी :
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकच आमदार योगेश कदम यांनी एकनाश शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. उर्वरित गुहागरचे आमदार भास्कर जाधव, रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि लांजा- राजापूरचे आमदार राजन साळवी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत.
ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. पालकमंत्री अनिल परब यांच्या हॉटेल प्रकरणी रामदास कदम यांचे मोबाईलवरील संभाषण आणि कदम यांना संघटनेपासून बाजूला ठेवले गेल्यामुळेच ते तिकडे गेले असावेत.
मुळ चिपळूणचे आणि सध्या गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे कट्टर शिवसैनिक, सुरवातीला शिवसेना, नंतर राष्ट्रवादी व आता पुन्हा शिवसेनेत आहेत. मंत्री सामंत हे सुरवातीला राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री व सध्या शिवसेनेत कार्यरत आहेत. तर आमदार राजन साळवी हे बाळासाहेबांचे कट्टर सैनिक आहेत. त्यांनी अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचे यापूर्वी अनेकदा जाहीर केले आहे. या सर्वांनी जिल्ह्यात आपापल्या मतदारसंघावर पकड ठेवली आहे. भाजप किंवा राष्ट्रवादीकडून त्यांना आव्हान देणारे नेतृत्व सध्या तरी नाही. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनाच वरचढ राहिली आहे. त्यामुळे हे सर्व आमदार मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबतच राहतील, असे दिसते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुतीच्या तोंडावर त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)