'कोमसाप'चे वाङमयीन पुरस्कार जाहीर.
केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी केली पुरस्कारांची घोषणा.
रत्नागिरी | ब्यूरो न्यूज : कोकणात लेखन, वाचन संस्कृती वाढावी यासाठी ‘कोमसाप’ने चळवळ सुरू केली. यातून जे लिखाण वाढीस लागले त्या साहित्याचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही पुरस्कार देतो. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी खूप उच्च दर्जाची पुस्तके पुरस्कारासाठी आली. त्यातून पुरस्काराची घोषणा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी दिली.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारे २०२२ – २३ चे वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कारांची कीर यांनी घोषणा केली. कादंबरी विभागात प्रथम क्रमांकाचा र. वा. दिघे स्मृती पुरस्कार प्रकाश हरिश्चंद्र पाटील यांच्या काश्मीर कनेक्शन या कादंबरीला, द्वितीय क्रमांकाचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार नागू वीरकर लिखित हेडाम कादंबरीसाठी, कथा विभागात प्रथम क्रमांकाचा वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार मनोज नाईक साटम यांच्या त्या वळणावर, तर द्वितीय क्रमांकाचा विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार दत्तात्रय सैतवडेकर यांच्या ब्रेकिंग न्यूज कथासंग्रहाला जाहीर झाला.
कविता विभागात प्रथम क्रमांकाचा आरती प्रभू स्मृती पुरस्कार राजीव जोशी यांच्या शतकोत्तरी ओरखडा, तर द्वितीय क्रमांकाचा वसंत सावंत स्मृती पुरस्कार रेश्मा राणे जाधव यांच्या एका सावलीचा शोध या कवितासंग्रहाला, आत्मचरित्र विभागात प्रथम क्रमांकाचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार अशोक बेंडखळे यांच्या महाराणी येसूबाई या संग्रहास, चरित्र विभागात श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार डॉ. स्मिता दातार यांच्या फक्त तिच्यासाठी या चरित्रास, समीक्षा विभागात प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. सोमनाथ कदम यांच्या प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक या ग्रंथास, नाटक विभागाचा भाई भगत पुरस्कार डॉ. सुभाष कटकदौंड यांच्या पुन्हा एकदा नव्याने जगायचंय मला या नाटकाला, ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार निर्मला रणजित शेवाळे यांच्या करंजमाळ या ग्रंथास, तर द्वितीय क्रमांकाचा सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार डॉ. मंजूषा कुलकर्णी यांच्या एक पाती गवताची या ललित ग्रंथास, बालवाङमय विभागाचा प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार स्टॅनली गोन्सालवीस यांच्या मुलांचे गांधी अंकल आणि इतर कथा या ग्रंथास, संकीर्ण विभागातील प्रथम क्रमांकाचा वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार रमेश धनावडे यांच्या कवितेच्या सुरातून यास, तर द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार सुखद राणे यांच्या इथे देशीचे या ग्रंथास आणि वैचारिक विभागासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार डॉ. आशुतोष रावीकर यांच्या भारताचे परकीय या ग्रंथास मिळाला आहे. विशेष पुरस्कार अनुक्रमे मराठी सातासमुद्रापार यासाठी मेघना साने, केमिस्ट्री कथासंग्रहासाठी रामदास खरे आणि शेवटची लिओग्राफी या कादंबरीसाठी डॉ. बाळासाहेब लबडे यांना जाहीर झाले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)