खालून उच्च विद्युतभारीत वाहिनी आणि वर खड्ड्यात साचलेले पाणी अशी कोकण रेल्वेच्या 'त्या' उड्डाणपुलाची स्थिती.
वेत्ये – सोनुर्ली मार्गांवरील या पुलावर अपघात घडल्यास जबाबदार कोण असा सवाल.
मळगांव | प्रतिनिधी : वेत्ये गावातून सोनुर्ली येथे जाण्यासाठी बनवलेला कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपुल सध्या धोकादायक बनला आहे. वेत्येमधील कोकण रेल्वेचा उड्डाणपूल हा मळगांव, वेत्ये व सोनुर्ली या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. सोनुर्ली, न्हावेली, निरवडे व पुढे जाणारी वाहने याच उड्डाणपुलावरून जात असतात. शिवाय स्थानिकांच्या वाहनांची वर्दळ या पुलावरून होत असते. गेल्या दोन – तीन महिन्यांत पडत असलेल्या पावसामुळे पाणी साचून उड्डाणपुलावरील रस्ता खड्डेमय झाला असून केवळ खड्डे बुजविण्यापुरती स्थिती या रस्त्याची नसून उड्डाणपुलावरील संपूर्ण रस्त्यावर नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची गरज आहे, या उड्डाणपुलाखाली कोकण रेल्वेची उच्च विद्युतभार क्षमतेची वाहिनी तथा लाईन असल्याने त्या उड्डाणपुलावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. हा पुल कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्याने यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व कोकण रेल्वे यांनी यापुलाची पाहणी करून गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पुढील महिन्यात सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदिरचा जत्रोत्सव देखील होणार आहे. त्यावेळी या उड्डाणपूलावरुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. अशा धोकादायक उड्डाणपुलावरुन प्रवास करताना अपघात घडल्यास याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सोनुर्ली, वेत्ये, मळगांव, निरवडे गावातील नागरीकांनी विचारला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)