आमदार वैभव नाईक भडकले : परप्रांतियांनचे चोचले सहन करु शकत नाही: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यवाहीवर आहे लक्ष.
मालवण | सुयोग पंडित : भाजप पक्ष मुंबईत परप्रांतीय लोकांना पक्षाची पदे देऊन त्यांना राजकीय बळ देत आहे. त्यामुळे मुंबईत उत्तर भारतीय मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यांनी मराठी माणसाचा रोजगार हिरावला त्यांच्यामार्फत विविध मार्गाने मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजप पक्षाने उत्तर भारतीय संघटना कार्यान्वित केली आहे. उत्तर भारतीयांना या संघटनेची पदे देऊन भाजपचे प्रदेश महामंत्री प्रद्युम्न शुक्ला यांच्या उपस्थितीत संघटनेची आढावा बैठक ओरोस येथे पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्तर भारतीयांना भाजपने पदे देऊन जिल्ह्यात उत्तर भारतीयांची संख्या वाढवून कोकणातील मराठी माणसाला हद्दपार करून सिंधुदुर्गची मुंबई करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. मात्र परप्रांतीयांचे चोचले पुरविणाऱ्या भाजपला कोकणवासीयच हद्दपार करतील असा घणाघात आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, परप्रांतीय लोक कोकणी माणसाचा रोजगार हिरावून घेत आहेत. शिवसेना एकमेव पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी झटत आहे.मराठी माणसांना शिवसेना पक्ष नेहमी संधी देत आला आहे. मात्र मराठी माणसाविरुद्ध भाजप षड्यंत्र रचत आहे. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गावात ग्रामपंचायत निवडणुकीत देखील सदस्य पदासाठी परप्रांतीय नागरिकाला भाजपने संधी दिली होती. जनतेने त्यांना नाकारले असले तरी स्थानिक लोकांना भाजपने संधी देण्याएवजी परप्रांतीयांना बळ देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. कोकणवासीयांनी यावर वेळीच जागृत होऊन या प्रवृती विरोधात लढा देणे गरजेचे आहे असे आ.वैभव नाईक म्हणाले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)