मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी येथील रस्त्यावर भगदाड
बांदा | राकेश परब : मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी येथील मोरीपुलाला जून महिन्यात भलेमोठे चार ते पाच फुटी भगदाड पडले होते. संबंधित विभागाने माती व दगडाच्या साहाय्याने भगदाड बुजविले मात्र काही दिवसांनी काल त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा भगदाड पडल्याने धोका निर्माण झाला आहे. कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने अशी परिस्थिती निर्माण होते, असा आरोप सावंतवाडी भाजप कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे यांनी केला आहे. तसेच सदर पुलाचे ऑडिट करून पूल वाहतुकीस सक्षम आहे की नाही ते सांगावे अन्यथा आम्हाला लोकशाहीचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा श्री. गावडे यांनी प्रशासनास दिला.
मडुरा-सातोसे-सातार्डा मार्गे रात्रंदिवस वाहतूक सुरू असल्याने रात्रीच्यावेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री एक दुचाकीस्वार सुदैवाने अपघातापासून बचावला. अचानक मोरीपुलावरील भगदाड दृष्टीस पडताच त्याने गाडीवर ताबा मिळवला. जून महिन्यात जर या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले असते तर धोकादायक प्रवास करावा लागला नसता. त्यामुळे पुढील धोका व हानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर धोकादायक भगदाड तात्काळ बुजविण्याची मागणी, बाळू गावडे यांनी केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)