मालवणच्या प्रसिद्ध जेष्ठ लेखिका वैशाली पंडित यांच्या "मंत्रभूल" या पुस्तकाला "महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम" समीर चौघुले यांची प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या " मंत्रभूल" या ललितबंध पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील सकाळ प्रकाशन ने केले आहे.
संतोष साळसकर | सहसंपादक: आम्हा उभयतांच्या आवडत्या लेखक लेखिकांपैकी एक म्हणजे प्रसिध्द जेष्ठ लेखिका मालवणच्या वैशाली पंडित विविध विषयांवरील आठ नऊ पुस्तकांनंतर, काहीशा विश्रांती नंतर, वैशालीताईंचे “मंत्रभूल” हे पुस्तक हातात पडले. दुग्धशर्करायोग म्हणजे विनोदासाठी माझ्या दैवतांपैकी एक असलेले विनोदी अभिनेते व लेखक श्री समीर चौघुले यांच्या प्रस्तावनारूपी शुभेच्छा या पुस्तकाला लाभल्या आहेत. वैशाली पंडितांचे या आधीचे ललितलेखनही वाचकांच्या जबरदस्त पसंतीस उतरलेले आहे आणि मंत्रभूल हा नवा अक्षरानुभवही तितकाच दर्जेदार असल्याची ग्वाही मी देतो. मंत्रभूल ही जगण्यात आलेल्या अनुभवांची एक संवेदनशील अशी स्मरणवही आहे. लेखिकेला निवृत्त वयात आलेले आणि घेतलेले अनुभव सजगपणे स्वीकारण्याचा नवा चष्मा मिळाला आहे. अनुभव, मग ते कटु असोत वा गोड, त्यात जिवंतपणा असतो आणि तो जिवंतपणा म्हणजेच जगणे अशी लेखिकेची धारणा आहे.वायुवेगाची तीर्थयात्रा या लेखात पवनचक्कीच्या परिसरातील बेभान वा-याचे वर्णन करताना , ” निसर्गाच्या या भव्य मंदिरात वा-याचे सहस्र नगारे, घंटाघड्याळे अविरत वाजत होती. या मंदिरावर कोणत्याही धर्माची नाममुद्रा नव्हती. कोणीही मर्त्य प्राणी तिथे कोणत्याही रंगाचं निशाण घेऊन उभा नव्हता.’ अशी एक स्वत्वाला विसरायला लावणारी सात्विक भावना त्यांनी व्यक्त केली आहे. जळप्राण सखे विहिरी गं, ऐकू न येणारी वाजंत्री, माझं जेवण चुलीत अशी शीर्षकेही कसदार प्रतिभेची साक्ष देतात.शुभेच्छा देताना श्री.समीर चौघुले यांनी म्हणलय की वैशाली पंडित निरीक्षण, स्वानुभव आणि व्यासंग यांच्या सुंदर मिलफातून वाचकाला परमानंदाच्या जवळ जवळजवळ ढकलतातच.’ ‘निशाणी डावा अंगठा’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक श्री.रमेश इंगळे उत्रादकर यांनीही मंत्रभूल संग्रहावर आपला अभिप्राय नोंदवला आहे. ते म्हणतात,’ जगणं सुसह्य करणारा वैशाली पंडितांना गवसलेला आनंदमंत्र आणि त्याची भूल रसिकांना एका अभूतपूर्व ग्लानीचे समाधान देईल.’हे लेखन जरी स्वानुभव सांगणारे असले तरी वाचकाला त्यात आपलेही प्रतिबिंब उमटलेले दिसते हे लेखिकेचे यश आहे.वाचकांना अजून काय हवय!! म्हणूनच ललितबंधाच्या आनंदाची मंत्रभूल प्रत्येकाने अनुभवावी अशीच आहे.वैशालीताईचा ‘मंत्रभूल’ हा ललितबंध पुण्याच्या सकाळ प्रकाशनाकडून प्रकाशित झाला आहे. सकाळ प्रकाशनाकडे मागणी केल्यावर हे पुस्तक आपल्यापर्यंत पोचू शकते. पुस्तकाची किंमत रू.१६० + १०० कूरियर खर्च. संपर्कासाठी क्रमांक ०२०-२४४०५६७८ / ८८८८८४९०५० प्रकाश तांबे 8600478883 यांनी वाचकांना आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)