……तर मनसैनिक नाक्यानाक्यावर गाड्या अडवतील ; मनसेचा जिल्हाप्रशासनाला इशारा
वनविभागाची कारवाई हे मनसेच्या आंदोलनाचे ‘फलित’ : अमित इब्रामपूरकर
सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासुन अवैध वृक्षतोड करुन लाकूड वाहतूक करणाऱ्यांना मुद्देमालासहीत पकडून वनविभाग संबंधितांवर गुन्हे दाखल करत आहे हे मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे फलित आहे.परंतु वनविभागाची ही कारवाई किरकोळ स्वरुपाची असुन याहीपेक्षा मोठी कारवाई करावी अन्यथा जिल्ह्यातील मनसेचे कार्यकर्ते नाक्या-नाक्यावर थांबून अवैध लाकुड वाहतुक करत असलेल्या गाड्या अडवतील याला प्रशासन व वनविभाग जबाबदार असेल असे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.पत्रकात पुढे ते म्हणतात मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली २३ आॕगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात अवैध वृक्षतोड थांबवावी,जिल्ह्यातील सर्व खाण प्रकल्प बंद व्हावेत,इंधन दरवाढ,अवैध मायनिंगला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्यावर कारवाई करा व अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भात मा.जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले होते.
देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणुनसिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव;पर्यटनजिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला.निसर्ग सौंदर्याने असलेल्या सिंधुदुर्गात अवैध वृक्षतोड गेले अनेक वर्षे सुरूच असून निवडून दिलेले जिल्ह्यातील मंत्री,लोकप्रतिनिधी या वृक्षतोडीबाबत मूग गिळून गप्प आहेत.मनसेने पर्यावरण दिनी आंदोलनाची हाक दिली होती.जिल्ह्यात पर्यावरणाची झालेली हानी पाहता वनविभागाने केलेली कारवाई किरकोळ स्वरुपाची आहे.याही पेक्षा मोठी कारवाई करावी.केवळ दोन,तीन ठिकाणी कारवाई करुन दिखावूपणा चालणार नाही.
अन्यथा जिल्ह्यातील मनसेचे कार्यकर्ते नाक्या-नाक्यावर थांबून अवैध लाकुड वाहतुक करत असलेल्या गाड्या थांबतील व मनसेच्या पद्धतीने कारवाई करतील.यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन व वनविभाग जबाबदार असेल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)