नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
ब्यूरो न्यूज: नेमळे पंचक्रोशी माध्य. व उच्च माध्य. हायस्कूल आणि श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व कला क्रीडा मंडळ नेमळेचे संयुक्त विद्यमाने 'कवी आपल्या भेटीला' हा अभिनव कार्यक्रम नेमळे हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) हे या कार्यक्रमात प्रमुख निमंत्रित अतिथी होते. त्यांनी अलीकडेच प्रकाशित झालेल्या त्यांच्या बकुळीची फुले काव्यसंग्रहातील विविध विषयांवरील कवितांचा जागर केला. यावेळी व्यासपीठावर नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्था व श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, संस्था सचिव पांडुरंग दळवी, प्राचार्य आर. के. राठोड, राजेश गुडेकर आणि प्रमुख अतिथी कवी दीपक पटेकर उपस्थित होते.
'कवी आपल्या भेटीला,' या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अनिल कांबळे यांनी प्रमुख अतिथी कवी दीपक पटेकर यांचा परीचय करून दिला. हा उपक्रम राबविण्यामागे मुलांमध्ये साहित्य, लेखन आणि वाचनाविषयी आवड निर्माण होऊन वाचनसंस्कृती वाढीस लागावी असा हेतू असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी संस्थाध्यक्ष आ. भि. राऊळ यांच्या हस्ते प्रमुख अतिथी दीपक पटेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कवी दीपक पटेकर यांनी मुलांना कविता कशी लिहावी याबद्दल मार्गदर्शन करताना गद्य लिहिलेल्या ओळी कशाप्रकारे पद्यात मांडाव्या याचे उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. तसेच कविता लिहिताना किंवा कोणतेही साहित्य लिहिताना कवीकडे शब्दसंपदा असणे आवश्यक असल्याचे सांगून इतर कवी लेखकांची पुस्तके, कविता यांचं अवांतर वाचन केले तरच तुम्हीही लेखक कवी म्हणून भविष्यात नावलौकिक प्राप्त करू शकता. अवांतर वाचन असेल तर भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये देखील त्याचा फार उपयोग होतो असे सांगून 'वाचाल तर वाचाल' ही बाबासाहेबांची शिकवण कायम स्मरणात ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी अलीकडेच प्रकाशित झालेल्या त्यांच्या बकुळीची फुले या वृत्तबद्ध काव्यसंग्रहातील निसर्ग कविता, जीवनाचे सार सांगणाऱ्या विविध कविता आणि काही मालवणी कविता सादर करून जणू कवितांचा जागर केला. नेमळे शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या कवी आपल्या भेटीला या उपक्रमासाठी त्यांनी संस्थेचे, ग्रंथालयाचे आणि हा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक वर्गाची प्रशंसा केली आणि त्यांना निमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. श्री. पटेकर यांनी हायस्कूल व ग्रंथालयासाठी बकुळीची फुले पुस्तके भेट दिली.
या कार्यक्रमाच्या दरम्यान नेमळे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग, जंतरमंतर वरील घटना, श्रावण यासह हिंदी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. यामध्ये प्रामुख्याने जान्हवी राऊळ, निमिष राऊळ, रोहन गावडे, रिया होडावडेकर, आर्यन कानसे, साईशा बांदेकर, फराहन कर्णेकर यांनी भाग घेतला. यावेळी महेंद्र सारंग, नेत्रा चव्हाण, नितीन धामापूरकर, चंद्रकांत वंगाळ, नूतन कडावलकर, क्रांती मयेकर, सुषमा कासार, नेहा कोंडये, म्हाडळकर, ग्रंथपाल आरती कोरगावकर, प्रथमेश करंगुटकर आदी शिक्षक, शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अनिल कांबळे यांनी केले. लवू जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)