बांदा परिसरातील लाखमोलाच्या जमिनी कोसळतायत तेरेखोल नदीत.....!
बांदा, शेर्ले, कास, किनळे, कवठणी, सातार्डा येथे देखील तेरेखोल नदी किनाऱ्यालगत शेकडो एकर जमीन नदीपात्रात कोसळली आहे.
ब्युरो रिपोर्ट | विवेक परब : गेली अनेक वर्षे व याही वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला आलेल्या भरतीच्या उधाणामुळे आरोसबाग येथे नदी किनाऱ्यालगतची माड बागायत मोठ्या प्रमाणात नदीपात्रात कोसळली आहे. यात लाखमोलाच्या सुपीक जमिनी तेरेखोलच्या उदरात गडप झाल्या आहेत. दरवर्षी सातत्याने कोसळणाऱ्या बागायतीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी तीव्रता वाढत जाणाऱ्या या संकटामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.तेरेखोल नदीला बांदा, आरोसबागपर्यंत समुद्राच्या भरतीचे पाणी येते. बांदा रामनगर, आरोसबाग, मिळगुळी, लकरकोट येथे तेरेखोल नदीच्या उधाणामुळे कित्येक एकर क्षेत्रातील जमीन नदीपात्रात कोसळली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी मेहनतीने फुलविलेली बागायती देखील नदीपात्रात कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी हा प्रकार होत असल्याने बागायती व शेतजमीन वाचविण्यासाठी नदी किनाऱ्यालगत दगडी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांमधून होत आहे. बांदा, शेर्ले, कास, किनळे, कवठणी, सातार्डा येथे देखील तेरेखोल नदी किनाऱ्यालगत शेकडो एकर जमीन नदीपात्रात कोसळली आहे. पावसाळ्यात तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्यात कित्येक एकर बागायती पाण्याखाली जाते. यावर्षी पुराचा सर्वाधिक फटका बांदा शहर, शेर्ले, आरोसबाग गावांना बसला होता.नऊ वर्षांपूर्वी तेरेखोल नदीकिनारी रामनगर याठिकाणी ३० मीटर लांबीची दगडी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात जमिनीची धूप थांबली होती. दरवर्षी याठिकाणी सुमारे ३० मीटर लांबीची भिंत बांधण्याचे आश्वासन मेरिटाईम बोर्डाकडून देण्यात आले होते; मात्र दुसऱ्याच वर्षी हे आश्वासन हवेत विरले. नदी किनाऱ्यालागतचे क्षेत्र ठिकठिकाणी कोसळल्याने आतापर्यंत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)