महावितरणने सतर्क रहाणे गरजेचे होते : तालुका प्रमुख हरी खोबरेकर.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण शहर व परिसरामध्ये काल २२ मे च्या वादळी पावसानंतर तब्बल २४ तासांपेक्षा जास्त काळ विजपुरवठा खंडीत झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. काल, वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहर परिसरात काही काळ थैमान घातले होते. यात काही विद्युत खांब व तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने शहर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. २४ तास उलटून गेले तरी वीज पुरवठा पूर्ववत करण्यास महावितरण अपयशी ठरले आहे याकडे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी विशेष लक्ष वेधले आहे. पावसाच्या आरंभीच जर महावितरणची अशी स्थिती असेल तर यंदाचा पावसाळी हंगाम ते ग्राहकांना काय सुविधा देणार असा जळजळीत प्रश्नही हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे.
गेले काही दिवस हवामान विभागाकडून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त होत होता. त्यानुसार काल सायंकाळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली मात्र महावितरण सतर्क नव्हते अशी खंत हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे. वादळी वारा, पाऊस अशी शक्यता वर्तविल्याने महावितरणने त्यादृष्टीने सतर्क राहणे गरजेचे होते. मात्र पहिल्याच पावसात सुरळीत वीज पुरवठा देण्यास महावितरण अपयशी ठरले. महावितरण कडे विद्युत खांब तसेच अन्य अत्यावश्यक साहित्यच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. जे खांब धोकादायक आहेत त्यावरूनच नवीन वीज वाहिन्या ओढण्याचे काम करण्यात आले असल्याचाही आरोप खोबरेकर यांनी केला आहे. सरत्या पर्यटन हंगामावरही याचा अनिष्ट परीणाम झाल्याने पर्यटन व्यवसाय व संबंधित सर्वांचे अतोनात हाल होऊन नुकसान झाल्याचेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)