टोलमुक्तीसाठी जिल्हा व्यापारी संघातर्फे बैठकीचे आयोजन ; जिल्हावासियांना एकवटण्याचे आवाहन.
सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील मुंबई गोवा महामार्गावरील रस्ता काम अद्याप पूर्ण झाले नसताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगांव येथे टोल नाका उभारून टोल वसुलीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पासिंग वाहनांना टोल फ्री देण्यात आला नाही त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात असून आंदोलन उभारले गेले पाहिजे असे जनमत तयार होत असताना येत्या ९ डिसेंबरला एका बैठकीचे आयोजन
करण्यात आले आहे.टोलमुक्त सिंधुदुर्ग होण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून शुक्रवार दि. ९ डिसेंबर जिल्हावासियांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद सरस्वती सभागृहात सायंकाळी ४ वाजता महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, असे निमंत्रक नंदन वेंगुर्लेकर यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम झाले आहे. मात्र रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील काम सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील सर्व काम झाले नसल्याने टोल वसुली करणे योग्य नाही असे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत तसेच केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गावर टोल नसेल असे म्हटले होते या आठवणींना उजाळा दिला जात आहे. समृध्दी महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली तशीच पहाणी या रस्त्यावर व्हावी अशी मागणी केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल वसुली नको म्हणत असताना काहींनी सिंधुदुर्ग जिल्हा पासिंग वाहनांना टोल फ्री झालाच पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान टोल फ्री करण्याच्या मुद्यावर चर्चा करून आंदोलनात्मक पावित्रा घेतला पाहिजे तर काहींनी न्यायालयीन लढा दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे या बैठकीत मोठ्या संख्येने जिल्हावासी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)