नव्या पिढीने स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान लक्षात ठेवावे- तानाजी मुलूख.
चिंदर | विवेक परब :
भारत मातेला परकीय जोखडातून मुक्त करण्यासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. पारतंत्र्यात या देशातील सर्वसामान्य नागरिकांना किती हालअपेष्टा व अत्याचार सहन करावे लागले याची देशातील नव्या पिढीला कल्पना नाही. आज देशात सर्वच बाबतीत सुबत्ता व सुखासिनता असली तरी या देशाला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले बलिदान नव्या पिढीने कायम लक्षात ठेवावे व त्यांच्या सदैव ऋणात रहावे असे विचार चंद्रनगर, ता. दापोली येथील ज्येष्ठ नागरिक तानाजी मुलूख यांनी ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमांतर्गत कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
भारतमातेला परकीय व पारतंत्र्याच्या शृंखलांमधून मुक्त करण्यासाठी देशातील स्वातंत्र्य सैनिकांना किती अत्याचार सहन करावे लागले, किती संघर्ष करावा लागला याची शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कल्पना यावी यासाठी त्या काळातील प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग शालेय विद्यार्थ्यांसमोर व्यक्त करण्यासाठी ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमांतर्गत जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा चंद्रनगर, ता. दापोली येथे चंद्रनगर गावातील ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच तानाजी मुलूख यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या मनोगतात बोलताना तानाजी मुलूख यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील अनुभव कथन करताना शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमांतर्गत एक प्रबोधनपर कार्यक्रम म्हणून चंद्रनगर शाळेच्या वतीने हा ज्येष्ठ नागरिकाच्या मनोगताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)