मालवण | प्रतिनिधी : प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. विद्यार्थ्यांनी आमच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील प्रत्येक क्षण आनंदाने साजरा करावा. शिक्षण घेत असताना वेळ आणि आपल्या पालकांनी आपल्यासाठी खर्च केलेला पैसा याची किंमत ओळखावी, शिस्त बाळगावी तरच आपल्या करिअरच्या दृष्टीने चांगली वाटचाल होईल, असे प्रतिपादन प्राचार्य शिवराम ठाकूर यांनी प्रथम वर्ष स्वागत समारंभात केले. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) वतीने प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन आणि स्वागत समारंभाचे आयोजन ३० जुलै रोजी करण्यात आले होते.
IQAC समन्वयक डॉ सुमेधा नाईक यांनी Code of Conduct अर्थात विद्यार्थ्यांची आचार संहिता या विषयावर मार्गदर्शन करताना कॉलेजच्या सर्व नियमांची माहिती दिली. डॉ. देविदास हारगिले यांनी अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाची माहिती दिली. प्रा. कैलास राबते यांनी मराठी विभाग, परीक्षा विभाग इत्यादी विषयी, तर डॉ उज्वला सामंत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सांस्कृतिक विभाग, विद्यार्थी ग्राहक भांडार, महिला विकास कक्ष इत्यादींची माहिती दिली.
डॉ. एच. एम चौगले यांनी हिंदी विभाग, अस्मिता अंक यांचा तर प्रा. एस पी खोबरे यांनी इंग्रजी विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांचा परिचय करून दिला. प्रा. संग्रामसिंह पवार यांनी ग्रंथालय विभाग, करिअर कट्टा उपक्रम आणि करिअर गाईडन्स आणि प्लेसमेंट सेल विषयी मार्गदर्शन केले. डॉ. संकेत बेळेकर यांनी भौतिकशास्त्र, डॉ उर्मिला मेस्त्री यांनी प्राणीशास्त्र, प्रा. अनघा टिकले यांनी वनस्पती शास्त्र, प्रा. रोहिणी फाटक यांनी भूगोल, तर प्रा. नेहा करंदीकर यांनी कॉमर्स विभागाचा परिचय करून दिला. डॉ सुमेधा नाईक यांनी डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग एज्युकेशन, IQAC, कॉमर्स असोसिएशन, अकांउंटन्सी, पर्यटन सप्ताह, आविष्कार स्पर्धा इत्यादी विभागवार उपक्रमांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
कार्यालय अधीक्षक श्री कैलास साळुंखे यांनी प्रशासकीय कामकाजाचे नियम विद्यार्थ्याना समजावून सांगितले आणि प्रशासकीय कर्मचारी श्रीमती सुचित्रा बेळेकर, कृत्तिका न्हिवेकर, तृप्ती चव्हाण यांचा परिचय करून दिला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री सूर्यकांत कदम यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमात प्राचार्यांच्या हस्ते कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वागत करण्यात आले. प्रा. कैलास राबते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. एस. पी. खोबरे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले तर डॉ उज्वला सामंत यांनी आभार मानले.
या समारंभासाठी प्रथम वर्ष कला, वाणिज्य , विज्ञान शाखेचे विद्यार्थी, वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक वृंद, प्रशासकीय कर्मचारी वर्ग, इत्यादी उपस्थित होते.