पासिंग होऊनही दिव्यांगांना (अपंगांना) स्वयंचालित तीन चाकी सायकलची बघावी लागतेय वाट..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समाज कल्याण मार्फत अस्थिव्यंग व्यक्तींसाठी स्वयंचालित तीन चाकी सायकलीची मंजुरी देण्यात आली आहे. समाजकल्याण निधिमधून प्रत्येकी ८६ हजार रुपये मंजुर झाले आहेत. परंतु पूर्ण रक्कम जमा झाल्याशिवाय गाडी न देण्याचं शोरूम कडून सांगण्यात आल्याने मागील पाच महिने या लाभार्थ्यांना आरटीओचे पासिंग होऊन सुद्धा गाड्यांच्या प्रतीक्षेत रहावे लागत आहे अशी माहिती लाभार्थ्यांच्या वतीने कमलकांत मेस्त्री यांनी दिली आहे.
आपल्या निवेदनात ते म्हणतात, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्याकडे खरेदीसाठी रक्कम नसल्यामुळे आम्ही शो रूममध्ये जाऊन ऍडव्हान्स चेकद्वारे प्रतिज्ञापत्र करून गाडी देण्याची विनंती केली असता पूर्ण रक्कम जमा झाल्याशिवाय गाडी न देण्याचं सांगण्यात आले. पाच महिने होऊन गेले तरी सामाज कल्याण अधिकाऱ्यांना फोन केला तरी कुठल्याही प्रकारची माहिती भेटत नाही आहे. नवीन खरेदी केलेल्या गाड्यांच्या पावत्या व इत्तर कागदपत्र आम्ही जमा केली. या गाड्या लाभार्थ्यांच्या नावे झालेल्या असून या गाड्या आर. टी. ओ. पासिंग सुद्धा झालेल्या आहेत. पण नावावर झालेल्या गाड्या कुठल्याही अपंगाच्या ताब्यात दिलेल्या नाहीत.गाड्या मंजूर झालेल्या अपंग लाभार्थ्यांना किती त्रास सहन करावा लागत आहे याकडे कोणी लक्ष देईल का? जिल्ह्यामध्ये अपंगांना न्याय भेटतच नाही, त्यांचा विचारच कोण करत नाही ,त्यांना का सहकार्य होत नाही ? असा प्रश्न सर्व अपंगांसमोर उभा राहिला आहे. पालकमंत्री यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन अपंगांना होणारा त्रास दूर करावा . सदर गाड्या कमलाकांत राजाराम मेस्त्री, बापू रामचंद्र पडवळ, तारक किशोर महाकाळ, राकेश श्रीकृष्ण गावंडे, नारायण श्रीधर परब, दिगंबर गंगाराम कदम, किशोर विलास सुतार,रोशन राजेंद्र तळावडेकर याना मंजूर झाल्या आहेत. तरी तातडीने याबाबत कार्यवाहीची मागणी अपंग लाभार्थ्यांनी केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)