नुकसानग्रस्तांनी केली सावंतवाडी तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे भरपाईची मागणी...!
बांदा |राकेश परब : यंदा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेरेखोल नदिला महापूर आला होता. नदीने धोक्याची पातळी ओलांडून पाणी शेर्लेसह इन्सुली, निगुडे व बांदा गावात घुसले होते. अन्य तिन्ही गावातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली परंतु शेर्लेतील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना अद्याप भरपाईची एक पै सुद्धा मिळाली नसल्याने नुकसानग्रस्तांनी सावंतवाडी तहसिलदारांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. तसेच तात्काळ भरपाई देण्याची मागणी केली.
सावंतवाडी तहसिलदारांना निवेदन देताना नुकसानग्रस्त साबाजी धुरी, सुरेश सातोसकर, सुवर्णा देसाई, जयवंत धुरी, मत्सुरा वड्डो, श्रेया तुळसकर, अन्विता धुरी, नागेश खाणगांवकर , प्रसाद तुळसकर, सविता धुरी, सदाशिव धुरी आदी उपस्थित होते.
तेरेखोल नदिला आलेल्या महापूरात शेर्ले गावाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले परंतु अद्याप भरपाई मात्र मिळाली नाही. अन्य पुरग्रस्त इन्सुली, निगुडे व बांदा या गावातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली परंतु शेर्ले गांव त्यापासून अद्यापही वंचितच आहे. यापूर्वी आम्ही तहसिलदार कार्यालयात भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. अधिकाऱ्यांनी पुरग्रस्तांची यादीच सादर करून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असे सांगण्यात आले होते. मात्र दिलेल्या आश्वासनाचा अधिकाऱ्यांनाही विसर पडल्याने किंवा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आम्ही भरपाईपासून वंचित राहिलो आहोत. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी सावंतवाडी तहसिलदार व आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)