डाॕ. भा. वा. आठवले यांचं पंचत्वी विलीन झाल्याचं वृत्त ऐकलं. ‘हे होणारच होतं’ माहीत असूनही मन गलबललं. डाॅक्टर म्हणून व्यावसायिक असली तरी पैशापलिकडची प्रॕक्टीस करणारे ते लोकप्रिय उपचारक होते. त्यांचं त्या विषयावरचं पुस्तकही खूप रंजक आणि उद्बोधक आहे. ग्रामीण भागात प्रॕक्टीस करणा-या डाॕक्टरांना पेशंट हाताळताना स्वतःलाच जबरे पेशन्स ठेवावे लागतात हे त्यांनी सोदाहरण सांगितले आहे.
ते उत्तम साहित्यिक होतेच पण त्याहूनही साहित्याचे उत्तम जाणकार होते. साहित्यिक डाॕक्टर म्हणूनच त्यांचा आणि माझा प्रथम परिचय खारेपाटण येथे झाला. त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद काळेसर स्वतः एक उत्तम साहित्यिक, कवी. मी तेव्हा अगदीच नवोदित लिंबूटिंबू कवयित्री. पण काळेसर मला कायम प्रोत्साहन देत असत.तेव्हा आणखी एक नवोदित पण माझ्या वरच्या इयत्तेत असलेला कवी मधुसूदन नानिवडेकर हा ही आमच्या समवेत होता. काळेसरांनी स्वतःसकट आमचा तिघांचा एक त्रिदल नावाचा काव्यवाचनाचा कार्यक्रम देवगडमध्ये करायचं ठरवलं. माझा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम . देवगडच्या डाॕ. भा. वा. आठवले यांच्याकडे आमची भोजन आणि रहाण्याची व्यवस्था होती. आठवलेबाई आणि डाॅक्टर यांनी आमची जी बडदास्त ठेवली तिने मला तेव्हा सेलेब्रिटी असल्याचा अनुभव दिला होता. त्रिदल कार्यक्रमाला देवगडची रसिक मंडळी होती. खूप दाद मिळत होती. तो कार्यक्रम यशस्वी होण्यात डाॕ. आठवलेंचा मोठा सहभाग होता. रात्री कार्यक्रमाहून आल्यावर त्यांचे हार्मोनियम वादन ऐकल्यावर तर ते क्षण सोनेरीच झाले. एक से एक नाट्यगीतं त्यांनी लीलया वाजवली होती. काटक अंगासरशी देहयष्टी. गोरेपान, घारे डोळे,अशा कोकणस्थी व्यक्तिमत्वात तुसडेपणा आणि खडूसपणा मात्र वजा होता…! स्वतः कर्तृत्वाने प्रचंड मोठे असणा-या या माणसात अहंपणा अजिबात नव्हता. माझ्या नंतरच्या साहित्यिक वाटचालीवर डाॕ.भा. वा. आठवले यांची जाणकार दाद वा सूचना मला खूप महत्वाच्या वाटत गेल्या. सिंधुदुर्गातल्या बहुतेक लेखकांना हा अनुभव आहेच.
वृत्तपत्रात एखादा लेख आला की पहिला फोन आठवले डाॕक्टरांचा ठरलेला असायचा निर्व्याज हसत ते मनमोकळं अभिनंदन करायचे. माझ्या प्रत्येक प्रकाशित पुस्तकांना तर त्यांचा आशीर्वाद मिळालाच पण माझ्या दोन्ही मुलांच्या पहिल्या पुस्तकाची बातमी समजताच त्यांचा आवर्जून कौतुकाचा फोन आला होता याचं मला विशेष वाटलं…! स्वतः उच्च दर्जाचा साहित्यिक असूनही नव्या लेखकांना दाद देणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे अव्वल रसिकलक्षण त्यांच्या ठायी होतं. आमच्या ‘ऐलमा पैलमा अक्षरदेवा सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाबद्दल’ त्यांना नेहमीच आदर होता. आमच्या उपक्रमाचं ते भरभरून कौतुक करत असत.
स्वतःबद्दल बोलतानाही लहान मुलाच्या उत्साहाने नवीन काय लिहिलं ते सांगत. नवं काय वाचलं ते सांगत. पंच्याण्णव वर्षांचे होते म्हणूनच एकढं परिपक्व मन त्यांना लाभलं होतं. ‘मी पण’ गळलेलं एक मधुर फळ होतं ते…! त्यांचं जाणं निसर्गनियमाला धरून आहे. ज्येष्ठत्व कसं साजरं करावं याची पाऊलवाट त्यांनी तयार करून दिली आहे.वैद्यकीय क्षेत्र, संगीत, वाचन, साहित्य, समाजाभिमुखता या सृजनात्मक गोष्टींनी त्यांचा आनंदघडा तुडुंब भरलेला होता. त्यांचं स्मरण करताना म्हणूनच …डोळ्यातून झरणारं पाणीही अ’शोक’ वनाच्या झ-याच्या तुषाराचंच सिंचन करत त्यांना सश्रद्ध आनंदांजली देत राहील…!
वैशाली पंडित ( संस्थापक, ऐलमा पैलमा अक्षर देवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूह / उपसंपादक आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.)