दरवेळी सरकारला किंवा कोणत्याही पक्षाला दोष देण्याची वृत्ती बळावली तर नागरीक म्हणून आपण अपयशी ठरतोय का याचे आत्मचिंतन करायची आवश्यकता असल्याचेही मांडले मत.
कणकवली | प्रतिनिधी : नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील समाजसेवक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी काही ठिकाणी, मतदारांचा मतदाना मधील कमी झालेला टक्का विषयावर एका प्रसिद्धी पत्राद्वारे भाष्य केले आहे. कुठलीच तेढ वगैरे निर्माण करायचा आपला प्रयत्न नसून नागरीक म्हणून मतदानाबाबत आपण कधी जागरुक होणार असा सवाल त्यांनी, प्राप्त होणार्या विविध ठिकाणच्या मतदान टक्केवारीवरुन केला आहे.
१०० टक्के मतदारांपैकी जर ५०% पेक्षा कमी मतदार त्यांचा मतदानाचा अधिकार बजावू शकत नसतील तर ती नागरीक म्हणून खंत आहे. निवडणूक आयोग, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सामाजिक मंडळं आणि राजकीय पक्षही त्यांच्यापरीने यथाशक्ती याची जागृती करत असतात. गेल्या दशकभरात, डिजीटल माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचायचे कामही निवडणूक प्रसार यंत्रणा करत आहेच. ही सर्व देशाच्या एकत्रीत प्रगतीच्या निश्चितीची माध्यमे आहेत. या सर्व प्रयत्नांकडे गांभिर्याने पाहून नागरीक म्हणून आपण त्यांना प्रतिसाद देणे जर आपल्याला जमत नसेल तर ते खरंच चिंतनीय असल्याचेही राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे.
आपण जर राजकीय योगदान देत नसू तर दरवेळी सरकारला किंवा कोणत्याही पक्षाला दोष देण्याची वृत्ती बळावेल. ही वृत्ती बळावली तर नागरीक म्हणून आपण अपयशी ठरतोय का याचे आत्मचिंतन करायची आवश्यकता असल्याचेही राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सांगितले आहे.
प्रसिद्धी पत्रात शेवटी पेडणेकर यांनी नमूद केले आहे की आपल्या देशातील विविध युगपुरुष, स्वातंत्र्यवीर यांनी जर देशाबाबत किंवा देशातील राजकीय घडामोडींबाबत अनास्था दाखवली असती तर आज आपले जगणेही मुश्किल झाले असते. अजुनही वेळ गेलेली नसून देशातील सर्व नागरीक आगामी सर्व निवडणुकांमधून देशाचे नागरीक असल्याचे प्रामाणिक व अत्यावश्यक कर्तव्य जबाबदरपणे समजून घेतील.
मतदानाचा योग्य व कायदेशीर पद्धतीने प्रसार केलेल्या सर्व व्यक्ती, संस्था, राजकिय पक्ष व यंत्रणा यांचे समाजसेवक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी या प्रसिद्धी पत्रात विशेष प्रशंसा केली आहे. या नंतरही त्यांचे प्रयत्न सुरु रहावे असे सांगताना त्यांनी मतदान हा सुटीचा दिवस नसून तो ‘आपल्यासाठीचा’ दिवस असतो असे नमूद केले आहे.