मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत पळसंब हद्दितल्या, खालची वाडी येथील ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ बंधार्याच्या तब्बल १८ प्लेटस् रातोरात गायब झाल्याची घटना माजी सरपंच व शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांच्या निदर्शनास आणली गेल्यानंतर, आज २० मार्चला त्यांनी आचरा पोलिस स्टेशन येथे धाव घेत, माजी सरपंच या नात्याने ग्रामस्थांच्यावतीने लेखी तक्रार अर्ज दिला आहे. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी, ही घटना १९ मार्च रोजी रात्री उशीरा घडली व तिथल्या काही स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.
या अर्जाद्वारे श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी, या घटनेमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झालेले असून व्हाळात (ओहोळात) असलेला पाणीसाठा रिकामा होऊन शेतीसाठी व बागायतीसाठी लागणार्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला असल्याचे नमूद करत या घटनेची तत्काळ व सखोल चौकशी करुन संबंधीत अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी आचरा पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. या अर्जा संदर्भातील घटनेची चौकशी करण्याचे व कार्यवाही करायचे आश्वासन आचरा पोलिस निरीक्षक यांनी दिले असल्याची माहिती माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिली आहे.