गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला- एकनाथ शिंदे.
वैभववाडी | प्रतिनिधी :
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली.
एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत म्हटलं की,गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला . यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अन्य एक ट्वीट करत त्यांनी पुढे म्हटलं की, पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं आहे असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.