कणकवली / उमेश परब :-भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन देशभरात झेंडावंदन करून साजरा केला गेला तसाच अनेक भारतीयांनी अगदी नाविन्यपूर्ण कल्पकतेनेही अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला. कणकवलीतील सायकल रायडर्स चा ग्रुप असलेल्या कनक रायडर्स च्या सायकलपटूंनी स्वातंत्र्यदिनी २०० किमी सायकलिंग पूर्ण करत तिरंग्याला मानवंदना दिली. कनक रायडर्सचे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे, नितांत राजन चव्हाण या सायकलपटूंनी १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता कणकवली हुन सायकल ने झाराप च्या दिशेने कूच केले. मकरंद वायंगणकर आणि विष्णू रामागडे यांनी झाराप हुन ओरोस रिटर्न आणि ओरोस हुन झाराप व झाराप ते वारगाव आणि वारगाव ते कणकवली असा प्रवास करून २०२ किमी सायकलिंग पूर्ण केले. तर एस. एम.हायस्कुल चा दहावी चा विद्यार्थी असलेल्या नितांत चव्हाण याने झाराप हुन कणकवलीत येत पुन्हा कुडाळ पर्यंत अंतर सायकलिंग ने पूर्ण केले. स्वातंत्र्यदिनी किमान ३०० किमी सायकलिंग पूर्ण करण्याच्या इराद्याने नितांत चव्हाण याने एकट्यानेच कुडाळहून लांजा पर्यंत सायकलिंग केले. लांजाहून कणकवली च्या दिशेने येत असताना वाकेड घाटात सायकलच्या ब्रेक केबल तुटल्यामुळे २२३ किमी अंतर झाले असताना नितांत ला सायकलिंग थांबवावे लागले. कणकवली च्या कनक रायडर्स च्या सायकलपटूंनी सायकलिंग करत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी तिरंग्याला दिलेल्या मानवंदनेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.