जलसिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत अशी केली मागणी
कणकवली | उमेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निधीअभावी रखडले ल्या जलसिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देऊन हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत अशी मागणी युथ वेलफेअर असोसिएशन या संस्थेकडून करण्यात आली आहे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन सादर करत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांची सद्यस्थिती त्यांच्यासमोर मांडली.
यावेळी संस्थेचे सचिव रुपेश घाडी, सहसचिव राऊफ काझी, सदस्य मनीष सागवेकर, सिंधुदुर्ग जिल्हा सचिव विवेक ताम्हणकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. आमच्या जिल्ह्याला पर्यटन दृष्ट्या जेवढे महत्त्व आहे तेवढिच शेती बागायती मध्ये या जिल्ह्यात मोठी क्रांती झालेली दिसते, मात्र यासोबतच ग्रामीण भागातील मोठे जमीन क्षेत्र पडीत आहे. या क्षेत्रापर्यंत पुरेसे पाणी पोहोचल्यास या ठिकाणी पर्यटना सोबतच कृषी क्षेत्रातून येथील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होईल.
मात्र शासकीय धोरणात इथले प्रकल्प अडकले आहेत. जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्या प्रकल्पांच्या कालव्यांची कामे झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्यात अडचणी येत आहेत. धरण उशाशी आणि कोरड घशाची या म्हणीप्रमाणे कोकणातील आमच्या शेतकरी बांधवांची स्थिती निर्माण झाली आहे.
ही अवस्था बदलण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून आपण गांभीर्याने या परिस्थितीकडे लक्ष द्यावे आणि कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. निधीअभावी रखडलेल्या प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, या प्रकल्पांचे कालवे अपूर्ण आहेत ते पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी अशी विनंती आम्ही आपल्याला करत आहोत.