साहित्यिक पिंड असणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एका मुक्त छंदातील कवितेचा भावानुवाद
वाढदिवस विशेष | आपली सिंधुनगरी चॅनेल : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पिंड साहित्यिकाचा आणि सर्व भारतीय भाषांवर प्रेम करणारा असल्याने जिथे जातील तिथल्या प्रादेशिक भाषेत मनापासून बोलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आता देशसेवक कार्यरत पंतप्रधान मोदीजींना साहित्यसेवेसाठी वेळ मिळत नसला तरी त्यांच्या भाषणांतील लय व शब्दांतून बाणा कवीचा असल्याचे पदोपदी जाणवते. कॅनडा येथील मराठी हिंदी, इंग्रजी व गुजराती साहित्यिक तसेच अनुवादक स्मिता भागवत यांनी कवी नरेंद्र मोदी यांच्या एका कवितेचा भावानुवाद.
“खुमारी..!“
प्रारब्धाचा विचार मी का करू, मी आव्हान पेलणारा माणूस आहे.
तेज उसने न घेणारा, स्वतः जळून उजेड निर्माण करणारा मी दीप आहे.
झळझळीत प्रकाशाचा मोह नाही, आत्मदीपाचा प्रकाश मला पुरेसा आहे.
धूसर धुक्यात मला रस नाही, मी नखशिखांत निखालस माणूस आहे.
प्रारब्धास कधीच भीक न घालणारा, मी आव्हान पेलणारा माणूस आहे.
कुंडलीच्या गुंत्यात मी अडकत नाही, की कुंडलीसमक्ष झुकतही नाही.
भेदरट भ्याडांच्या सारीपाटावर सोंगट्या हलवणे मला अजिबात पसंत नाही.
मी माझा वंशज आणि मीच माझा वारस, प्रारब्धास जो जुमानत नाही, दोस्तांनो
यातच लागतोय माझ्या प्रयत्नांचा कस, यातच लागत राहील प्रयत्नांचा कस..!!
दोस्त जीवनाचे
आम्ही जीवनाचे दोस्त आहोत, अहो आम्ही साक्षात प्रेम आहोत
आम्ही मनःपूत उडणारे आणि सागरात आसुसून डुंबणारे
आणि पहाडावरील सूर्य आहोत, आम्ही मध्यरात्री उगवणारे
आम्हाला अभिनिवेशाची आस नाही की कुणाची भीडभाड नाही
शहाणे आम्हाला वेडे समजतात नि वेडे आम्हाला शहाणे म्हणतात
ते खरे आहेत आणि आम्हीही खोटे नाही.
मुक्त जीवनसागर उसळतो आहे आम्ही डबक्यातले बुडबुडे नाही
आम्ही दर्याचा प्रवाह आहोत, आम्हाला मुळी किनाराच नाही
आम्ही जीवनाचे दोस्त आहोत, अहो आम्ही साक्षात प्रेम आहोत.
कर्मयोग्याचा जीवनधर्म
टोळ्यांचे मेळाव्यात रुपांतर करणे, हे कर्म नसून माझा जीवनधर्म आहे.
मानसिकता माझी ‘आहे’ म्हणणाऱ्याची तसेच ‘नाही’स नकार देणाऱ्याची
आणि कोसळणारी इमारत सावरण्यास आवर्जून टेकू देणाऱ्याचीही,
इतरांपाशी असतील राघव माधव, मला आकर्षण कर्मयोग्याच्या साधनेचे,
थकल्या कार्यरत देह-मनाला रिझवणाऱ्या सुरेल समर्थ वेणूचे
आणि नेट लावून आव्हान पेलणाऱ्या शिवधनुष्याचे
मी ना ईश्वर की ना सैतान, प्रिय मला मानवत्व, तेच माझे ध्येय आहे.
मला ना स्वर्गाची आस की नरकाचे भय, कारण जमीन माझी जहागिरी आहे,
नांदतो मी ज्या भूमीवर, तिथे मला नंदनवन फुलवायचे आहे
टोळ्या टळाव्यात नि मेळावे भरावेत, हे माझे स्वप्न नसून ध्येय आहे.
या ध्येयाच्या पूर्तीसाठी मी तनमन झिजवतो आहे, दोस्तांनो
टोळ्यांचे मेळाव्यात रुपांतर करणे, हा माझा जीवनधर्म आहे.