ज्येष्ठ समाजसेवक व पत्रकार श्री. अण्णा केसरकर यांचे नेतृत्व.
बांदा | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे सुरु झालेल्या आत्मक्लेश आंदोलनात, अवघ्या हिंदवी स्वराज्याचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बेताल व अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शांत का आहेत असा सवाल आंदोलन कर्त्यांनी केला आहे.
ते यासंदर्भात कोणती भूमिका घेणार असाही प्रश्न आज येथे झालेल्या आत्मक्लेश आंदोलनात आंदोलकांनी उपस्थित केला आहे .
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाबाबत युवापिढीसह सर्वांना जागृत करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे .
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अनुभवी पत्रकार अण्णा केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गवळी तिठा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, उमेश कोरगांवकर, अफरोज राजगुरू, देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी, इफ्तिकार राजगुरू, भार्गव धारणकर, दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, तुकाराम कासार, सिताराम गावडे, लवु पार्सेकर, पंकज मडये, विजय टोपले, रवि जाधव, संदिप राणे, मोहन जाधव, परशुराम गावडे, विजय पवार, मनोज राऊळ, वैभव माठेकर, अमोल सारंग, सत्यजित धारणकर, अभिषेक सावंत, सुधीर पराडकर आदींसह मोठ्या संख्येने छत्रपती शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी श्री. अण्णा केसरकर म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारण सत्तेत येण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आला. मात्र आज भाजपाचे केंद्रातील नेते छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधाने करत आहे ही संतापजनक खंत आहे . मग त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही शांत का आहेत असा खडा सवाल त्यांनी केला. तर सत्तेत येण्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करावा ही त्यांची राजकीय कुटनीती आता जनतेसमोर उघड आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना जशास तसे उत्तर मिळेल. मात्र महाराष्ट्रातील युवा पिढीतील प्रत्येकाला ही बाब समजायला हवी, आणि यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करताना कोणाचीही जीभ घसरता कामा नये, यासाठीच हे आंदोलन आम्ही छेडले आहे . त्यामुळे जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी केंद्रातील त्या नेत्यांना सबुरीचा सल्ला द्यावा, अन्यथा जर छत्रपती शिवप्रेमी जर पेटून उठले तर त्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
(फोटो सौजन्य : सावंतवाडी ब्युरो)